आंबेगावच्या पश्चिम भागात उशिरा, पण दमदार पाऊस
मंचर – भात शेतीचं आगार अशी ओळख असलेल्या आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, निगडाळे, कोंढवळ, पोखरी, तळेघर, पाटण, भागीतवाडी, असाणे, आहुपे आदी गावांत भात आवणीला (लावणीला) प्रारंभ झाला आहे. यावेळी पावसाने उशिरा हजेरी लावल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
भीमाशंकर, पाटण, आहुपे खोऱ्यातील शेतकरी भात हेच पीक घेतात. या भागात इंद्रायणी, जीर, तांबडा रायभोग, खडक्या या भात पिकांची लावणी केली जाते. आजच्या आधुनिक युगात ट्रॅक्टरशिवाय बैल जोडीच्या सहाय्याने चिखल (गाळ) करून भात लावणीची पद्धत या भागात आजही पाहावयास मिळते. बाहेरगावी नोकरी, व्यवसाय करणारे शेतकरीही सुट्टी काढून इर्जिक पद्धतीने एकमेकांच्या शेतीच्या कामासाठी मदतीला जाण्याची पद्धत अजूनही या भागात टिकून आहे. भात रोपे लावणीकरिता सुरुवातीला चारही बाजूला बांध करून शेतात चिखल केला जातो. त्यानंतर भाताची रोपे ओळीने लावून घेतली जातात.
यंदा काही शेतकऱ्यांनी अत्याधुनिक यंत्रांचा वापर करुन भात लावणी करत आहे. वेळ आणि मजूर खर्चात बचत होत असल्याने पहिल्यांदाच यांत्रिक भात लागवड काही भागात सुरू आहे. सध्या मजुरांची टंचाई भासत असल्याने काही शेतकरी घरच्या घरी तर काही शेतकरी मजूर शोधून आणून भात लावणी करत आहेत.
मजुरांचे दरही जास्त असल्याने काही शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. काही शेतकरी डोंगर उतारावर नाचणीचे पीक घेत आहेत. या भागातील अतिवृष्टीमुळे भात पिकांचे नुकसान झाल्यास शासनाने वेळेत मदत द्यावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
आदिवासी भागात या वर्षी उशिरा पावसाला सुरुवात झाल्याने भात अवणीला उशीर झाला आहे. मजुरांची टंचाई असल्याने भात लागवड करणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे.
– वामन लोहकरे, भात उत्पादक शेतकरी, निगडाळे
जुलै महिना संपत आला असून भात अवनीने वेग घेतला आहे. पाऊस जर असाच वेळेवर पडत राहिला तर भात उत्पादन चांगले होईल.
-किसन कुऱ्हाडे, भात उत्पादक शेतकरी.