कृषी अधिकारी ढगे यांची माहिती : यंदा भात लागवडीच्या क्षेत्रात 20 टक्के वाढ होणार
पिंपरी – भातपीकावर पडणाऱ्या कीड, रोगामुळे 25 टक्के उत्पादन घटते, पर्यायाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. उत्पादकता वाढविण्यासाठी यंदा कृषी विभागाने एक पाऊल पुढे टाकत शेतीशाळा, “क्रॉपशॅप’ हे पथदर्शी प्रकल्प हाती घेतले आहेत. विशेष म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत यंदा 10 टक्के वाढ करून ते 41 क्विंटलपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, तालुक्यात 15-20 टक्के भातपिकाचे क्षेत्र वाढणार आहे, अशी माहिती कृषी अधिकारी देवेंद्र ढगे यांनी दैनिक “प्रभात’ला दिली.
मावळ तालुका हा भाताचे आगार असून, बहुतेक शेतकरी खरीप हंगामात भात पीक घेतात. भात पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या मावळात इंद्रायणी हे वाण प्रामुख्याने घेतले जाते. तसेच फुले समृद्धी, पवना यांचेही काही प्रमाणात पीक घेतले जाते. पीक चांगले यावे याकरिता शेतकऱ्यांनी भात लागवडीकरिता चार सूत्री तंत्रज्ञान वापरले होते. चारसूत्री शेती तंत्रज्ञान सोपे, शास्त्रीयदृष्ट्या कार्यक्षम आणि एकूण लागवडीचा म्हणजे बी, मजूर व खत यांचा खर्च कमी करणारे, वातावरणाचे प्रदूषण टाळणारे व भातशेती निश्चितपणे फायदेशीर करणारे ठरले आहे.
मावळ तालुक्यात 25 मे ते 8 जून दरम्यान “उन्नत शेती, समृद्ध शेती’ पंधरवडा साजरा केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या मशागतीपासून कृषी सहाय्यक भात उत्पादक शेतकऱ्याला मार्गदर्शन करीत आहे. वडगाव येथील कृषी संशोधन केंद्रामध्ये अडीच हजार क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यात आले होते. याशिवाय खडकाळा येथील बीजगुणन केंद्रामध्ये सध्या 50 क्विंटल भातबियाणे उपलब्ध आहे. सध्या इंद्रायणी आणि फुले समृद्धी हे भात वाणाला शेतकऱ्यांची पसंती मिळते. शेतकऱ्यांनी संकरित वाणाची पेर केल्यास मिळणारे उत्पादन अधिक असेल, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.
सुमारे नऊ हजार 700 हेक्टर क्षेत्र भात लागवडीचे असले तरी गतवर्षी 10 हजार 300 हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती. यावर्षी त्यामध्ये 15-20 टक्के वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे यंदा 10 हजार 500 हेक्टर क्षेत्रावर भातलावगड होईल, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे. लागवडीबरोबर उत्पादनाचा विचार केला, तर गतवर्षी सरासरी 36.50 क्विंटल हेक्टरी उत्पादकता होती. यंदा त्यामध्ये 10 टक्के अधिकचे “लक्ष्य’ ठेवले आहे. याशिवाय गतवर्षी 141 क्विंटल प्रतिहेक्टरी उच्चांक आहे. बहुतांशी शेतकऱ्यांची उत्पादकता सरासरी 60-80 प्रतिहेक्टरी असल्याचे नोंद आहे.
“क्रॉपशॅप’मुळे कीड, रोगाचे उच्चाटन
मुख्यत्वे भातपिकाला “खोड कीड’ रोगाचा प्रादूर्भाव अधिक असतो. पिकावरील रोगाचा प्रादूर्भाव “कंट्रोल’ करण्यात येत आहे. त्याकरिता क्रॉपशॅप विकसित केले आहे. क्रॉपशॅप म्हणजे कीड, रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प. कीड, रोगापासून भातशेती सुरक्षित ठेवण्यासाठी शासनस्तरावर “क्रॉपशॅप’ हे मोबाईल ऍप विकसित केले आहे. भातलागवडीपासून ते काढणीपर्यंत पिकावर मोबाईल ऍपद्वारे लक्ष दिले जाते. किडीमुळे 25 टक्के उत्पादकता घटते. पर्यायाने शेतकऱ्यांची उत्पन्न कमी होऊन आर्थिक भूर्दंड पडतो. क्रॉपशॅप, शेतीशाळा याशिवाय तालुक्यात भातपीक प्रकल्प राबविण्यात येत आहे. यामध्ये शेतकऱ्यांला बियाणे, खते-औषधे मोफत “डोमोस्टेशन’ (पथदर्शी प्रकल्प) राबविण्यात येत आहे. याप्रकल्पातून अन्य शेतकऱ्यांनी बोध घ्यावा, हा यामागचा कृषी विभागाचा प्रयत्न आहे.
गतवर्षी जुलै-ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्याने भातपिकावर कीड, रोगाचा प्रादूर्भाव झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यासाठी शेतकऱ्यांच्या नुकसानीस जबाबदार धरून कृषी विभागाकडून कंपन्यांकडे दाद मागण्यात आली. वेळोवेळी पाठपुरावा करून आम्ही शेतकऱ्यांना तब्बल एक कोटी 85 लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळवून दिली. यंदाही शेतीशाळा, क्रॉपशॅप ऍपच्या माध्यमातून भात उत्पादनात अधिक वाढ होण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. त्यादृष्टिने गतवर्षीपेक्षा 10 टक्के अधिकचे उद्दिष्ट ठेवले आहे.
– देवेंद्र ढगे, तालुका कृषी अधिकारी, मावळ.