नगर – काटवन खंडोबा रोड येथील गाझीनगर भागात अनेक दिवसापासून ड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, या भागात साथीचे आजार पसरु लागल्याने स्थानिक नागरिकांनी मनपा उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांना निवेदन देऊन ड्रेनेजलाईन तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली.
यावेळी आशा गायकवाड, हसीना शेख, समिना शेख, आयेशा बागवान, रेशमा बागवान, मनिषा शिंदे, हाजराबी शेख, शाहीन शेख, फरीदा शेख आदिंसह स्थानिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित ंहोत्या.
काटवन खंडोबा रोड येथील गाझीनगर भागात अनेक दिवसापासून ड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या परिसरात मोठी दुर्गंधी पसरल्याने नागरिकांना घरात थांबणे देखील कठिण झाले असून, पाऊस आल्यानंतर काही नागरिकांच्या घरात देखील हे मैलमिश्रीत पाणी शिरत आहे. वारंवार मनपा प्रशानाला कळवून देखील हा प्रश्न सुटत नसल्याने नागरिकांच्या संतप्त भावना आहे. गाझीनगर भागात अनेक दिवसापासून ड्रेनेजलाईन तुंबली असून, ड्रेनेजच्या घाण पाण्याचे डबके साचले आहे. या भागात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे.
तर अस्वच्छता, दुर्गंधी व डासांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिका व स्थानिक नगरसेवक देखील या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
दोन दिवसानंतर तुंबलेल्या ड्रेनेजलाईनचे काम करुन देण्याचे आश्वासन उपायुक्त पठारे यांनी दिले. हे काम न झाल्यास आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.