नगर -राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेली 52 वर्षे समाजाचे विविध प्रश्न सोडवण्याचे काम केले आहे. पुरुषांबरोबरच महिलांना योग्य पदांचा सन्मान मिळवून दिला. आज महिला विधानसभा व संसदेत आपल्या कामाचा ठसा उमटवत आहेत. युवतींना शिक्षणात सवलती देण्याचे काम केले आहे. राज्यात करोना संकटाच्या काळात आघाडी सरकारने सर्वोत्तम काम करुन नागरिकांच्या आरोगयाकडे लक्ष केंद्रीत केले. परंतू विरोधक सत्तेसाठी वैफल्यग्रस्त झाल्यामुळे बेताल वक्तव्य करत असल्याचे, प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महीला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले.
राष्ट्रवादी शहर व जिल्हा महिला कॉंग्रेसच्या मेळाव्या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष चाकणकर बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक, पक्ष निरीक्षक वर्षा शिवले, प्रदेश उपाध्यक्षा निर्मला मालपाणी, जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड, शहर जिल्हाध्यक्षा रेश्मा आठरे आदी उपस्थित होत्या.
चाकणकर म्हणाल्या की, शरद पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण मिळवून दिले. त्यामुळे महिलांना महापौर, जिल्हा परिषद अध्यक्षा, नगराध्यक्षा आदी पदांवर काम करण्याची संधी मिळाली. तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यात बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे काम केले आहे. राजकारणात महिलांनी पुढे येऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातुन समाजाचे प्रश्न सोडविण्याचे काम करावे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष गावपातळीवर महिलांचे संघटन वाढवित असून प्रत्येक गावात महिला अध्यक्ष नेमावेत. तसेच महिलांची बुथस्तरीय रचना बळकट करून शरद पवारांचे विचार सामान्यांपर्यंत पोहोचवावेत असेही त्यांनी सांगितले.
मंजुषा गुंड म्हणाल्या की, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्ह्यात चांगले काम आहे. राज्यातील आघाडी सरकारच्या योजना वंचितांपर्यंत नेण्याचे काम सुरु आहे. शहर जिल्हाध्यक्षा रेश्मा आठरे म्हणाल्या की, आ. संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसने शहरात चांगले काम केले आहे. महिलांचे संघटन व बूथ रचना मजबूत केली आहे.