पेठ येथे जलसंपदा विभागाच्या विरोधात आंदोलन
मंचर/पेठ – डिंभे धरणाच्या (ता. आंबेगाव) तळाशी बोगदा करून त्याचे पाणी नगर-जामखेड भागात नेणाऱ्या प्रकल्पाला आमचा विरोध कायम आहे, असा इशारा जिल्हा परिषदेची माजी सदस्य देविदास दरेकर यांनी दिला.
जलसंपदा विभागाच्या विरोधात विविध मागण्यांसाठी पेठ (ता. आंबेगाव) येथे मंगळवार (दि. 18) आयोजित आंदोलन प्रसंगी जिल्हा परिषदेची माजी सदस्य देविदास दरेकर बोलत होते. यावेळी उद्योजक भाऊसाहेब सावंत पाटील, मंगेश पवळे, वसंत एरंडे, जयसिंग घेवडे, महादेव कराळे, विलास घेवडे, संजय कडूसकर, प्रल्हाद कुदळे, शांताराम पठारे उपस्थित होते.
डिंभे धरणातून बोगदा करून त्याद्वारे 6 टीएमसी पाणी नगर-जामखेड भागात नेण्यासाठी 359 कोटींचा प्रकल्प मंजूर झाला असून, या प्रकल्पाला विरोध आहे. या प्रकल्पामुळे घोडनदीला वाहणारे पाणी सोडणार नाही, तसेच डाव्या कालव्यालाही पाणी सोडणार नाही, असा शासन आदेश आहे, त्यामुळे हे पाणी सोडल्यास आंबेगाव तालुक्यातील अनेक गावे दुष्काळी होतील.
सरकारने हा प्रकल्प रद्द करावा त्याऐवजी कळमोडी प्रकल्प आणि चाऱ्यासाठी निधी मंजूर करून त्याद्वारे पाणी नेण्याचे नियोजन करावे, अशी मागणी दरेकर यांनी केली आहे. हा मानवनिर्मित बोगदा करण्याचा ठराव युती सरकारच्या काळात झाला होता.
रोहित पवार आमदार झाल्यानंतर त्यांनी जामखेडला पाणी नेता येईल अशी मागणी केली, त्यासाठी बोरघर येथे बोगदा घ्यावा लागेल हे त्यांना आपल्याजवळील अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यासंदर्भात या अगोदर 89 बैठका झाल्या, त्या बैठकीला तालुक्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी रवींद्र तोत्रे, अशोक धुमाळ, अशोक राक्षे, गणपतराव कराळे याची भाषणे झाली. प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार सचिन वाघ, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन पाटील आणि मंचरचे पोलीस निरीक्षक बळवंत माडगे यांनी आंदोलकाच्या निवेदनाचा स्वीकार केला.
…अन्यथा धरणात उड्या मारणार
या प्रकरणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लक्ष घालावे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहे. हा बोगदा 17 फूट खाली झाल्यानंतर 6 टीएमसी पाणी बोगद्याद्वारे पळवले जाणार आहे. असे झाल्यास आंबेगाव, शिरूर, जुन्नर तालुक्यात शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळणार नाही. या सर्व प्रकल्पाला आमचा विरोध असून हा प्रकल्प करण्याचा प्रयत्न केल्याचा आम्ही धरणात उड्या मारू असा इशाराही देविदास दरेकर यांनी दिला आहे.