पुणे – लांबलेला पावसाचा फटका गोड सीताफळाला बसला आहे. सीताफळाचा हंगाम महिनाभर लांबला आहे. नेहमीच्या तुलनेत सीताफळाची निम्मीच आवक होत आहे. होणाऱ्या आवकमध्ये 30 टक्केच माल दर्जेदार आहे. उर्वरित माल खराब, अपरिपक्व आणि दर्जाहीन आहे.
दर्जेदार मालालाच मागणी असल्याची माहिती व्यापारी पांडुरंग सुपेकर आणि माऊली आंबेकर यांनी दिली. साधारणपणे दरवर्षी जून महिन्यात सीताफळाचा हंगाम सुरू होतो. जुलै महिन्यात आवक वाढत असते; मात्र यंदा लांबलेल्या पावसाचा फटका आवकवर झाला आहे.
येथील बाजारात दररोज 8 ते 10 टन आवक आहे. ही आवक नेहमीच्या तुलनेत निम्म्याहून कमी आहे. मार्केटयार्डात घाऊक बाजारात किलोला दर्जानुसार 20 ते 150 रुपये भाव मिळत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भाव टिकून आहे. हवेली, पुरंदर तालुका, सोलापूर आणि नगर जिल्ह्यातून आवक होत आहे.