कराड – भाजपला जगातील सर्वात मोठा पक्ष बनविण्यासाठी अनेक नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी मोठे योगदान दिले आहे. इथे बसलेले वारियर्स हे भविष्यातील पक्षाचे नेतृत्व असून सर्व वारियर्स, कार्यकर्त्यांच्या योगदानातूनच महाविजयाचा हा संकल्प पूर्णत्वास जाणार आहे, असा ठाम विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
येथील स्व. वेणूताई चव्हाण स्मारक सभागृहात आयोजित महाविजय २०२४ सातारा लोकसभा अंतर्गत भाजप कराड दक्षिण, उत्तर व पाटण विधानसभा मतदारसंघ वारियर्स संवाद बैठकीत बोलत होते. प्रदेशाध्यक्ष आ. बावनकुळे यांचे स्वागत भाजप सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांनी केले.
आ. बावनकुळे म्हणाले, मे-जून २०२४ मध्ये नरेंद्र मोदी जेव्हा पुन्हा पंतप्रधान पदाची शपथ घेतील, तेव्हा साताऱ्यातून भाजपचा खासदार महाराष्ट्रात सर्वात जास्त मते घेतलेला असला पाहिजे. तसेच या प्रत्येक बुथवरून ५१ टक्क्यांपेक्षा जास्त मते घेऊन तो निवडून आला पाहिजे, हा संकल्प या बैठकीच्या निमित्ताने करूया. तसेच ३० नोव्हेंबर २०२४ ला महाराष्ट्र विधानसभा पूर्ण होईल, तेव्हा सातारा जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात भाजप आणि महायुतीचे उमेदवार याच पद्धतीने विजयी करण्याचे लक्ष्य ठेवा.
नरेंद्र मोदींनी जगातील सर्वोत्तम भारत हा संकल्प केला आहे. आत्मनिर्भर भारताचा संकल्प केला आहे.” जगातील १५० देशातील लोकांनी मोदींना जगातील सर्वोत्तम नेता मानलेले आहे. अमृतकाळातील भारताचे साक्षीदार होण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी वारियर्सना संघटना व बूथ बांधणीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. अतुल भोसले यांनी आभार मानले.
यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माजी खासदार अमर साबळे, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, सरचिटणीस विक्रांत पाटील, मुरलीधर मोहोळ, आमदार जयकुमार गोरे, मकरंद देशपांडे, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, मनोज घोरपडे, रामकृष्ण वेताळ भरत पाटील, सुनील काटकर, माजी आ. प्रमोद जठार, तालुकाध्यक्ष पैलवान धनंजय पाटील, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, सुदर्शन पाटसकर, विक्रमशील कदम, सागर शिवदास, समृद्धी जाधव आदी उपस्थित होते.
त्यानंतर येथील आझाद चौक ते चावडी चौकादरम्यान आ. बावनकुळे यांनी पायी चालत ‘मेरी मिट्टी मेरा देश’, तसेच घर चलो अभियानांतर्गत’ त्यांनी व्यापारी, नागरिकांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी देशाचे पंतप्रधान कोण व्हावेत? असेच त्यांनी विचारले असता, नागरिकांनी नरेंद्र मोदी-नरेंद्र मोदी-नरेंद्र मोदी असा जयघोष केला. भाजपच्या या अभियानास नागरिकांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.
नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान व्हावेत –
आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी कराडच्या मुख्य बाजारपेठेतून पदयात्रा काढत घर चलो अभियान राबवले. यावेळी त्यांनी सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधत देशाचे पंतप्रधान कोण व्हावेत? असा प्रश्न केला. त्यावेळी नागरिकांनी नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान व्हावेत, असे सांगत त्यांच्या नावाचा जयघोष केला.