Chandrasekhar Bawankule on Thackeray । उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील शाब्दिक चकमक आता इतर नेत्यांवरही परिणाम करत असल्याचे दिसत आहे. त्यात उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचा एकेरी उल्लेख केल्यानंतर आता भाजपकडून याचे सडेतोड उत्तर देण्यात आले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना उत्तर देत त्यांच्यावर टीका केलीय.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावती येथे शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले. याविषयी बोलताना, “महाराष्ट्रातील १४ कोटी नागरिकांचं गोपनीय मत घेतलं तर महानालायकाच्या पहिल्या नंबरवर उद्धव ठाकरे दिसतील. ज्या उद्धव ठाकरेंनी पालघरचं साधुसंतांच हत्याकांड बघितलं, तेव्हा ते मूग गिळून गप्प राहिले. ज्यांनी कोविड काळात १०० कोटीचा भ्रष्टाचार केला, त्यांनी १४ कोटी जनतेला वाऱ्यावर सोडलं. अडीच वर्ष पेन न वापरणारा आणि दोन दिवस मंत्रालयात येणारा मुख्यमंत्री आम्ही पाहिला. ते उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना नालायक म्हणत आहेत. महाराष्ट्रातील जनता त्यांना माफ करणार नाही”, अशा शब्दात उत्तर दिले.
“उद्धव ठाकरे पिसाळलेले…” Chandrasekhar Bawankule on Thackeray ।
अनिल देसाई यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करत टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देत असताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही ठाकरेंवर एकेरीत टीका केली. “उद्धव ठाकरे पिसाळलेले आहेत, त्यांना ठाऊक आहे की, मागच्या वेळेस मोदीजींचा फोटो लावून १८ खासदार निवडून आले. आता मोदींचा फोटो गेला आणि मोदींचं नावही गेलं, त्यामुळे त्यांची १८ खासदारांची संख्या आता दोन-चार वर येईल. त्यामुळेच उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झाले आहेत. नैराश्यामुळे त्यांच्या मनावर परिणाम झाला असून त्यातूनच ते असे बोलत आहेत. त्यांना महाराष्ट्रातल्या उत्कृष्ट अशा मनोरुग्णालयामध्ये दाखल करण्याची गरज आहे”, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
उद्धव ठाकरेंनी आता लाज सोडली Chandrasekhar Bawankule on Thackeray ।
दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्स वरही पोस्ट टाकून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. या पोस्टमध्ये ते लिहितात, “देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर खुपसून स्वतः मुख्यमंत्रिपदावर बसायचं, मुलाला मंत्रिपद द्यायचं आणि बाळासाहेबांच्या निष्ठावंत शिवसैनिकाला वाऱ्यावर सोडायचं याला कोडगेपणा म्हणतात. लोकसभा निवडणुकीत जनाधार मिळत नसल्यानं उद्धव ठाकरेंनी आता लाज सोडली आणि वाट्टेल ते बडबडत आहेत. तुम्ही कितीही शिव्याशाप द्या, देवेंद्रजींसारख्या सच्चा नेत्याला त्यानं फरक पडणार नाही पण येत्या निवडणुकीनंतर जनता तुम्हाला मात्र कायमचं घरी बसवेल हे नक्की.”