बंगळुरू: प्रख्यात शास्त्रज्ञ के. कस्तुरीरंगन यांनी शालेय शिक्षणातील ऑनलाइन शिक्षण पद्धत कुचकामी असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यातून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव नसल्याचे मतही त्यांनी दिले आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समोरासमोर शिकवण्याने या प्रक्रियेत जिवंतपणा येतो आणि हा जिवंतपणाच महत्त्वाचा आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
कस्तुरीरंगन हे सरकारच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी म्हटले आहे की, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात संवाद असला पाहिजे, त्यातूनच कल्पनांची देवाणघेवाण होऊ शकते, त्यासाठी ऑनलाइन शिक्षण पद्धत हा पर्याय होऊ शकत नाही. सध्या करोनाच्या प्रसारामुळे सर्वत्र ऑनलाइन शिक्षणाचा पुरस्कार केला जात आहे त्या संबंधात त्यांनी हे मतप्रदर्शन केले. ते म्हणाले की, विद्यार्थ्याचे त्यांच्या शिक्षकांशी थेट कनेक्शन असण्याला या शिक्षण पद्धतीत खूप महत्त्व आहे.
विद्यार्थ्यांमधील खेळकरपणा, त्यांच्यातील कल्पनाशक्तीला वाव देणे ही उद्दिष्टे ऑनलाइन पद्धतीने साध्य होणार नाहीत. ते म्हणाले की, मुलांच्या बुद्धीची 85 टक्के वाढ वयाच्या आठव्या वर्षापर्यंत होते. त्यामुळे त्या वयाच्या मुलाच्या शैक्षणिक उन्नतीकडे जातीने लक्ष देणे आवश्यक असते. त्यासाठी शास्त्रावर आधारित नवीन शिक्षण पद्धतीचा आपण अवलंब केला पाहिजे.
वयाच्या आठव्या वर्षापर्यंत मुलांच्या बुद्धिमत्ता विकासाकडे नीट लक्ष देण्याची गरज आहे. त्याला चालनाही देण्याची गरज आहे. उच्च शिक्षणासाठी ऑनलाइन पद्धत एकवेळ योग्य ठरू शकेल पण ज्यांच्या बुद्धिमत्तेच्या वाढीची प्रक्रिया सुरू आहे त्या मुलांच्या शिक्षणासाठी ऑनलाइन पद्धत योग्य नव्हे, असे स्पष्ट मतही त्यांनी व्यक्त केले.