पिंपरी – बाह्य जगाशी फारसा संपर्क नसलेल्या तसेच वयाची साठी उलटलेले अनेक जण ऑनलाइन टास्कबरोबरच अन्य पद्धतीच्या ऑनलाइन ठगीच्या प्रकारांना बळी पडत आहेत. मागील महिन्यात असे हातोहात फसविले गेलेल्या व्यक्तींची संख्या 36 एवढी होती. एक लाखांपासून 35 लाख रुपयांपर्यंत नागरिकांना गंडा घालण्यात आला आहे. यात उच्चशिक्षित तरुण-तरुणीपासून ते ज्येष्ठ नागरिक सर्वांनाच फसविले जाते. आमच्या पोस्टला लाइक, रिव्ह्यू द्या, पैसे मिळतील. ऑनलाइन टास्क खेळा, पैसे मिळतील असे सांगून खाते रिकामे केले जाते. या प्रकारांमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. कमी रकमेचा गंडा घातलेल्या नागरिकांची संख्या खूप अधिक असून ते तक्रार देण्यास पुढे येत नाहीत.
ऑनलाइन फसवणूक करताना सायबर गुन्हेगार चार टप्प्यांचा वापर करतात. पहिल्या टप्प्यात विश्वास संपादन केला की पुढचे काम सोपे होते. दुसऱ्या टप्प्यात नागरिकांना कमी काळात मोठ्या फायद्याचे आमिष दाखवले जाते. या आमिषात अडकल्यास पुढचे काम आणखी सोपे होते. यातच नागरिकांना पैसे गुंतवण्यास सांगितले जाते. गुंतवलेले पैसे नफ्यासह काढण्यासाठी आणखी मोठी रक्कम गुंतवावी लागेल, असे सांगून आणखी मोठ्या रकमा भरण्यास भाग पाडले जाते.
दरम्यान ऑनलाइन टास्क दिला जातो. तो पूर्ण केल्यास पैसे मिळतील, असे सांगितले जाते. हा सायबर गुन्हेगारांचा तिसरा टप्पा असतो. चौथा टप्पा म्हणजे, नागरिकांना अशा गुंतवणुकीतील धोका समजू दिला जात नाही. त्यामुळे अधिक आमिषापोटी ते गुंतवणूक करत राहतात. शेवटी फसवणूक झाल्याचे लक्षात येते. अनेकदा सुरुवातीलाच काही रक्कम गुंतवली असता हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे समजते देखील. परंतु गुंतवलेली रक्कम मिळविण्यासाठी पुन्हा मोठी रक्कम गुंतवली जाते.
ऑनलाइन माध्यमातून गुंतवणूक अथवा आर्थिक व्यवहार करताना संपर्क साधणारी व्यक्ती, संस्था आणि बॅंक धारक याची खातरजमा करावी.आपण गुंतवणूक करत असलेला व्यवसाय भारतात मान्यताप्राप्त आहे का, त्याला कायद्याचे संरक्षण आहे का, आपण गुंतवणूक करताना संस्था अथवा व्यक्तीसोबत सामंजस्य करार केला आहे का. केला असेल तर त्यातील अटी आणि शर्ती बारकाईने पाहणे आवश्यक आहे.
– डॉ. संजय तुंगार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर सेल
गुंतवणूक करताना खबरदारी महत्त्वाची
ऑनलाईन गुंतवणूक करताना नागरिकांनी विवेक बुुद्धी वापरून खबरदारी घेणे आवश्यक आहे. आपण कोणत्या कंपनीसोबत व्यवहार करत आहोत, ती कंपनी खरोखर अस्तित्वात आहे का? त्या कंपनीची भारतीय कंपनी नोंदणी कायद्यानुसार नोंदणी झाली आहे का? आपण गुंतवणूक केलेले पैसे कंपनी कुठे वापरते. कंपनीचे उत्पादन काय आहे, त्याला मान्यता आहे का? अशी प्राथमिक माहितीची खातरजमा केली असता समोरची अनोळखी व्यक्ती खरोखर कंपनीची प्रतिनिधी आहे अथवा सायबर गुन्हेगार आहे, हे लक्षात येऊ शकेल.