पुणे -शहरात दररोज तीन ते चार अपघाताच्या घटना घडतात. यामध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्य सरासरी दररोज एक मृत्यू अशी आहे. बहुतांश अपघात हे शहरालगत किंवा शहरातून गेलेल्या महामार्गांवर होत आहेत. शहरात 2019 च्या अपघातांची तुलना केली असता, 2022 मध्ये आजवर अपघातांच्या संख्येत 33 टक्के इतकी वाढ झाल्याचे दिसते. 2020-2021 दरम्यान करोनामुळे बंधणे होती त्यामुळे अपघातांची संख्याही कमी झाली होती.
वाहतूक शाखेने दिलेल्या माहितीनूसार सोलापूर ते लोणीकाळभोर आणि अहमदनगर ते लोणीकंद महामार्गाच्या पुणे शहराच्या हद्दीत रस्ते अपघातात 173 जणांचा मृत्यू झाला आहे. तर कात्रज -देहुरोड बायपास महामार्गावर 63 जणांचा मृत्यू झाला आहे. याबरोबरच शहराच्या मध्यवर्ती भागातही अपघातात मृत्यू पडणाऱ्यांची संख्या दखल घेण्याजोगी आहे. येथे दुचाकी चालकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
हेल्मेट न घालण्याच्या सवयीमुळे किरकोळ अपघातातही काही जणांचा मृत्यू झाला आहे. महामार्गावरील वाढत्या अपघातामागे अतिवेग आणि वाहतूकीच्या नियमांचे पालन न करणे ही प्रमुख कारणे आहेत. मृत्यू पडणाऱ्यांमध्ये पादचाऱ्यांची संख्या महामार्गावर जास्त आहे.
अपघात टाळण्यासाठी आम्ही लवकरच अपघातप्रवण ठिकाणांची पाहणी करणार आहोत. तज्ञांच्या मदतीने तेथे काही उपाययोजना करण्याचा प्रयत्न आहे. तसेच शहरातील ब्लॅक स्टॉपचाही (वारंवार होणारी अपघाताची ठिकाणे) नव्याने अभ्यास करण्यात येणार आहे. वाहतूक पोलिसांनी 2020-2021 मध्ये केलेल्या अभ्यासात 19 ब्लॅक स्टॉप आढळून आले आहेत.
– विजय मगर, वाहतूक पोलीस उपायुक्त