मुंबई – मागील काही महिन्यांपासून प्रचंड उलथापालथी अनुभवणाऱ्या महाराष्ट्रातील राजकारणात शुक्रवारी अत्यंत महत्वपूर्ण आणि निर्णायक घडामोड घडली. शिवसेनेवर हक्क कुणाचा, या कळीच्या मुद्द्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने अंतिम निर्णय दिला. आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील असणारी शिंदे गटावर खरी शिवसेना म्हणून शिक्कामोर्तब केले. तसेच, धनुष्यबाण हे चिन्ह देखील शिंदे गटाला बहाल केले. भाजपच्या साथीने महाराष्ट्राची सत्ता सांभाळणाऱ्या शिंदे गटासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय सुखावणारा आहे.
दरम्यान, शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या महत्वपूर्ण निकालावर महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांनी आपली प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. अश्यातच, शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी मोठा गौप्यस्फोट केला असून, त्यांच्या या विधानामुळे आगामी काळात राजकीय वर्तुळात मोठी हालचाल होण्याची शक्यता आहे.
प्रतापराव जाधव म्हणाले, “निवडणूक आयोगानं मोठा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे खरी शिवसेना कोणाची यावर शिक्कामोर्तब झालं आहे. पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे गटाला मिळाल्यानं शिंदे गटात उत्साहाच वातावरण आहे. दरम्यान, आता लवकरच आता शिंदे गट आपला मोर्चा हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे वळवणार असून, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे काही आमदार भाजप आणि शिंदे गटात दिसतील’ असा मोठा गौप्यस्फोट प्रतापराव जाधव यांनी केला आहे.
राज्यात राजकीय भूकंप होईल असं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार बोलले होते. त्यावर उत्तर देताना खासदार प्रतापराव जाधव यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, आता त्यांच्या या विधानामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या कालच्या निर्णयामुळे खरी शिवसेना कोणाची यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे.