मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले आहे. यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असल्याचे मानले जात आहे. यावर माजी खासदार आणि स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली.
संभाजीराजे छत्रपती याची निवडणूक आयोगाच्या निर्णयावर म्हणाले, “निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय लोकशाहीचा भाग आहे. ज्यांना जे चिन्ह मिळालं त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, पण माझ्या दृष्टीने चिन्ह आणि नाव कुणाला मिळालं याचं लोकांना किती देणंघेणं आहे हे माहिती नाही. आमचे प्रश्न कधी सुटणार इतकंच लोकांना जाणून घ्यायचं आहे. मागील दोन तीन वर्षातील अस्थिर सरकारमुळे लोकांचे प्रश्न सुटलेले नाहीत. त्यामुळे निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय प्रक्रियेचा भाग आहे.”
“माझी सरकारला विनंती असणार आहे की, त्यांनी लोकांचे प्रश्न लवकरात लवकर सोडवावे. मी अनेक प्रश्न घेऊन सरकारकडे जातो. ते प्रश्नही अद्याप सुटलेले नाहीत. पक्षाचं नाव आणि चिन्हा हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. त्याच्याशी स्वराज्य संघटनेचा काहीही संबंध नाही. स्वराज्यच्या वतीने आमच्या त्यांना शुभेच्छा,” असं मत संभाजीराजेंनी व्यक्त केले.
संभाजीराजे छत्रपती पुढे म्हणाले, “लोकशाही असलेल्या भारताच्या घटनेत एक प्रक्रिया लिखित आहे. त्याप्रमाणेच सगळं चालतं. निवडणूक आयोग स्वतंत्र आयोग आहे. त्यामुळे त्यावर आमच्यासारख्या लोकांनी भाष्य करणं उचित नाही. त्याला एक व्यवस्था आणि प्रक्रिया आहे. त्यानुसार आयोग निर्णय घेत असतो.”
“उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाला हे मान्य नसेल, तर ते सर्वोच्च न्यायालयात धाव घेतीलच. त्यानंतर काय भूमिका घ्यायची हे सर्वोच्च न्यायालयही ठरवेल. लोकशाहीचं सौंदर्यच हे आहे की, अन्याय वाटत असेल, तर उद्धव ठाकरेंच्या गटाला सर्वोच्च न्यायालयात जाता येईल,” असेही संभाजीराजेंनी नमूद केले.