मुंबई : राज्याचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. यादरम्यान विरोधकांकडून वेगवेगळ्या मुद्द्यावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यादम्यान अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले. आजच्या अधिवेशनाच्या प्रश्नोत्तराच्या तासावरून ही खडाजंगी झाल्याचे दिसून आले.
आजचे अधिवेशन सुरु झाले तेंव्हा सभागृहात अनेकदा हात वर करूनही प्रश्न विचारण्याची संधी दिली नाही असे म्हणत भास्कर जाधव यांनी विधानसभेत अध्यक्षांवर आक्षेप घेतला. यावर फडणवीसांनी अशा प्रकारे अध्यक्षांवर हेतू आरोप करणे योग्य नाहीये. असं काही असेल तर अध्यक्षांना जाऊन भेटा. एकावेळी शंभर लोकं हात वर असतात, अनेक जण प्रत्येक प्र श्नावर हात वर करतात प्रत्येक वेळी बोलायला मिळेल असं नाही,
“ठरवून भास्कर जाधव यांना बोलू देऊ नये अशा प्रकारचा कोणाचा हेतू नाहीये, असा आरोप करणं योग्य नाहीये. ते (भास्करराव जाधव) अनेकदा चिडतात तेव्हा असे शब्द निघतात तुम्ही सिनियर आहेत अशी भूमिका घेऊ नका” असेही फडणवीस म्हणाले.
पुढे उपमुख्यमंत्र्यांना उद्देशून बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, उपमुख्यमंत्री महोदय आपण माझ्या भावना समजू शकलात, आपल्यात जे वाक्चातुर्य आहे त्याला तोड नाहीये.पण गेल्या वर्षी एका वेळेला आठ-आठ लक्षवेधी लागायच्या. लक्षवेधींचा स्कोप आणि व्याख्या तुम्हाला माहिती आहेत. मी अध्यक्षांकडे जाऊन माझ्या दोन लक्षवेधी लावा विनंती केली. मी अनेकदा त्यांच्याकडे जातो, भेटून चहा पिऊन येतो. काही जरी चुकीचं झालं असेल तरी कानावर घालतो.मी राष्ट्रवादी अध्यक्ष असताना त्यांच्या प्रचाराला मीच गेलो होतो .
पण खाजगीत तुम्ही (देवेंद्र फडणवीस) काही सांगून ठेवलं आहे की काय, तुम्ही जर असं काही सांगून ठेवलं असेल तर मला सोबत घेऊन चला आणि हा विषय संपवून टाका असं भास्करराव जाधव म्हणाले.
यावर फडणीसांनी सभागृहात उभे राहत मिश्कील भाषेत उत्तर दिलं. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला यासगळ्या पाठीमागचं कारण लक्षात आलं आहे. तुम्ही केवळ त्यांना (भास्करराव जाधव) चहा प्यायला देताय, तुम्ही त्यांना केक खायला देत नाहीये. आज त्यांना गोड केक खाऊ घाला आणि त्यांचं म्हणणं समजून घ्या. भास्करराव असं काही नाही इथं सर्वांना संधी आहे, कमी अधिक असेल तर अध्यक्ष लक्ष घालतील असे फडणवीस म्हणाले.