पृथ्वी केवळ मनुष्यप्राण्याची नसून सर्वांची आहे, हा निसर्गाचा संदेश आपण समजून घेतला पाहिजे आणि स्वीकारलाही पाहिजे. “सबकी बात और सबका साथ’ हा नारा बुलंद करण्याची आज गरज आहे. हा नारा केवळ मनुष्यप्राणी आणि त्याचा विकास एवढ्यापुरता सीमित असता कामा नये. त्यात अशा सर्व जीवजंतूंचा समावेश करण्यात आला पाहिजे, ज्यांना निसर्गाने आपल्याबरोबर घडविले आहे.
आर्थिक विकासाच्या वेगात आपण निसर्गचक्राकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे; परंतु ही पृथ्वी केवळ मनुष्यप्राण्याची नसून, त्याच्यासोबत निसर्गाने जेवढे जीवजंतू निर्माण केले, त्या सगळ्यांची आहे, हा विचार मागे पडला आहे. आपण आपले परिस्थितीकीय तंत्र समजून घेतले नाही. आपण केवळ आर्थिक तंत्रच समजून घेतले. त्यामुळेच आज निसर्गाचा अंश एका अदृश्य रूपात आपल्यात शिरला आहे आणि त्याचे गंभीर परिणाम आपण भोगत आहोत.
गेल्या काही वर्षांपासून जगाला घाबरवून सोडणाऱ्या अनेक बातम्या आपल्याला ऐकायला मिळाल्या आणि त्यातील सर्वाधिक घडामोडी पर्यावरणाशी निगडीत होत्या. या कालावधीत आर्थिक आणि निसर्गाशी संबंधित आपत्तींचा मुकाबला आपल्याला वारंवार करावा लागला आणि सर्व घटनांचे विश्लेषण अंतिमतः निसर्गावर झालेल्या अतिक्रमणांशीच जोडणारे होते. गेल्या काही वर्षांमधील घटनांकडे पाहिले असता, दरवर्षी वेगवेगळ्या स्वरूपाची वादळे येतात आणि मोठ्या प्रमाणावर नुकसान करून जातात, असे आपल्याला दिसते. “अम्फान’ नावाच्या वादळामुळे झालेल्या नुकसानीतून सावरायलाही आपल्याला वेळ मिळाला नव्हता, तोपर्यंत “निसर्ग’ चक्रीवादळ आले. एवढेच नव्हे तर गेल्या दोन ते तीन दशकांत अनेक आजारांची नावेही आपण पहिल्यांदाच ऐकली. यात बर्ड फ्लू, स्वाइन फ्लू, इबोला आणि आताचा करोना अशा महाभयानक रोगांचा समावेश असून, माणसाने आपले परिस्थितीकीय तंत्र समजून न घेतल्यामुळेच हे आजार उद्भवले आहेत. निसर्गाला समजून घेण्यात आपण पूर्णपणे अपयशी ठरलो आहोत, हे उघड झाले आहे.
वास्तविक आपल्या जीवनचक्रातील प्रत्येक घटना निसर्गाशी थेट जोडलेली असते, या गोष्टीला आपण कधी महत्त्वच दिले नाही. पूर्वी पूर किंवा भूकंपासारख्या आपत्ती आल्यास त्यांचा परिणाम दहा-दहा वर्षे पाहावयास मिळत असे; परंतु आता अशा घटना जणू रोजच्याच झाल्या आहेत. परंतु सर्वांत चिंताजनक गोष्ट अशी की, या आपत्तींशी झुंज देण्याची आपल्या समाजाची क्षमता हळूहळू क्षीण होत आहे. याचे एक कारण असेही आहे की, आता येणाऱ्या आपत्तींची व्याप्ती मोठी आणि परिणाम अधिक गंभीर आहेत. ज्या परिस्थितीकीय तंत्राने निसर्ग आणि पृथ्वी जोडली गेली आहे, ते समजून घेण्याचा आपण कधी प्रयत्नच केलेला नाही. आपण जगभरात एकच तंत्र महत्त्वाचे मानले आणि ते म्हणजे अर्थतंत्र. हेच तंत्र अधिकाधिक सक्षम बनविण्यासाठी आपण संपूर्ण विज्ञान तिकडे केंद्रित केले. कारण आपल्याला आपले जीवन अधिक आरामदायी हवे आहे. एवढेच नव्हे तर या काळात परिस्थितीकीमधील बराच हिस्सा माणसाने आपल्या कब्जात घेतला.
मागील दोन-तीन दशकांपासून ज्या प्रजातीची संख्या सर्वाधिक वाढली ती प्रजाती म्हणजे माणूस. सुरुवातीला कोणत्याही प्रजातीची संख्या परिस्थितीकी निश्चित करीत होती; परंतु जसजसे माणसाने आपल्या जीवनाची रक्षा करण्याचे विशेष प्रयत्न सुरू केले, तेव्हापासून जगात माणसांची संख्या वेगाने वाढत गेली. अदृश्य विषाणू आणि कीटकांचा विषय या ठिकाणी महत्त्वाचा नाही, कारण ते नेहमीच गौण स्थितीत राहिले आहेत आणि हस्तक्षेप झाला तरच त्यांनी आपल्या संख्येचे प्रदर्शन केले आहे. माणसाची केवळ आपल्यासाठी संसाधनांचा संचय करण्याची वृत्ती आणि अन्य प्राणिमात्रांना समजून न घेण्याचा माणसाने केलेला मूर्खपणा, याचा परिणाम म्हणूनच आज आपण एक मोठे आणि अज्ञात संकट झेलतो आहोत.
एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून आजअखेर आपण सुमारे 41 टक्के उभयचर प्राणी गमावले आहेत. सागरी जीवांनाही धोक्यात आणले आहे. जगातील कीटकांच्या 10 टक्के प्रजाती आता या जगात राहिलेल्या नाहीत. आपण समुद्रातील 33 टक्के प्रवाळाचे खडकही या जगातून नष्ट केले आहेत. त्याचप्रमाणे आपण 90 टक्के पिकांच्या प्रजातीही पूर्णपणे नष्ट केल्या आहेत. सोळाव्या शतकापासून आजअखेर नऊ टक्के पाळीव प्राण्यांच्या प्रजातीही आज आपल्यासोबत राहिलेल्या नाहीत. एका ढोबळ अंदाजानुसार, आपण आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या सुमारे 80 लाख प्रजाती नामशेष केल्या आहेत आणि सुमारे 10 लाख प्रजाती नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. आपण आपल्या भोवतालातून किती मोठ्या प्रमाणावर जीवप्रजाती नष्ट केल्या, हे या आकडेवारीतून दिसून येते. आपणच तयार केलेल्या संकटांसोबत आपण जगात एकाकी पडलो आहोत, असेच म्हणावे लागते.
समुद्राची परिस्थितीकीही आपण बिघडवून टाकली आहे. शास्त्रीय भाषेत सांगायचे झाल्यास, कार्बन उत्सर्जनाचा 60 टक्के भाग समुद्र शोषून घेतात; परंतु कार्बन उत्सर्जन सातत्याने वाढत असल्यामुळे आता समुद्रातही 400 “डेड झोन’ निर्माण झाले आहेत. म्हणजेच, या भागांमध्ये आता जीवनाचे अंश दिसत नाहीत. वेटलॅंड म्हणजे दलदलीची क्षेत्रे हीसुद्धा परिस्थितीकीचा महत्त्वपूर्ण हिस्सा असतात; परंतु गेल्या 300 वर्षांत आपण जगातील 15 टक्के दलदलीचे क्षेत्र गमावले आहे. औद्योगिक क्रांतीनंतर वनभूमीही 68 टक्क्यांनी घटली आहे आणि 1992 ते 2000 या कालावधीत लाखो हेक्टर जंगले आपण आपल्या गरजा भागविण्यासाठी नष्ट केले आहे. त्या मोबदल्यात नव्याने जंगलांची निर्मिती करण्याचे आपले प्रयत्न शून्यच आहेत.
– अनिल प्रकाश जोशी