आचार्य अत्रे यांचा आज स्मृतिदिन. लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी व वक्ते असे त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा जन्म 13 ऑगस्ट 1898 रोजी पुरंदर तालुक्यातील कोडीत खुर्द येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण सासवड येथे तर उच्च शिक्षण पुणे येथे झाले. लंडन येथे तत्कालीन शैक्षणिक क्षेत्रातील टी.डी. ही पदविका मिळविणारे ते पहिले महाराष्ट्रीय होते.
आचार्य अत्रे यांच्या लेखनात लहानमोठी चरित्रे, व्यक्तिदर्शने, मृत्यूलेख, प्रवासवर्णने, वृत्तपत्रीय लेख, साहित्यविषयक लेख, त्यांनी केलेल्या भाषणांचा हशा आणि टाळ्या यांच्या उल्लेखासह केलेला संग्रह यांचा समावेश आहे. पु. ल. देशपांडे व त्यांची तुलना करताना त्यावेळी लोक म्हणत आचार्य अत्रे यांची टीका व विडंबन जिव्हारी लागते, तर पु. ल. यांचे विनोद व टीका खुसखुशीत असतात.
50 वर्षांपूर्वी पाठ्यपुस्तकांमध्ये त्यांच्या सुभाष वाचनमालेचा समावेश होता. लहानपणापासून त्यांना कविता करणे, कोट्या करणे याचा छंद होता. त्यांचे “कऱ्हेचे पाणी’ हे आत्मचरित्र वाचावे ते वाचताना जर कुणाचे पोट दुखत असेल तर ते नक्कीच थांबेल.त्यांनी एकंदर 25 नाटके लिहिली त्यापैकी साष्टांग नमस्कार, लग्नाची बेडी, जग काय म्हणेल?, भ्रमाचा भोपळा, मोरूची मावशी, उद्याचा संसार, तो मी नव्हेच, ही त्यांची रंगभूमीवर गाजलेली काही नाटके.नाटकांमध्ये काही तत्कालीन घटनांचा संदर्भ असायचा.
त्यांनी “केशवकुमार’ या नावाने विडंबनात्मक कविता लिहिल्या. “झेंडूची फुले’ हा त्यांचा विडंबनात्मक कवितांचा संग्रह. आधुनिक मराठीतील विडंबनकाव्याची परंपरा त्यांच्या काव्यसंग्रहापासून झाल्याचे मानण्यात येते.त्यांनी “नवयुग’ हे साप्ताहिक व “मराठा’ हे दैनिक चालविले होते. त्याकाळी “दैनिक मराठा’ हे त्यांचे वर्तमानपत्र सनसनाटी बातम्यांसाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या वृत्तपत्रातून ते अनेक राजकीय नेत्यांवर अत्यंत जहरी व उपहासात्मक टीका करीत असत.
अशा वेळी कोण जवळचा, कोण मित्र याची पर्वा न ठेवता ते सत्य बाहेर आणीत. त्यामुळे त्यांना पुढारी वचकून असत. पुण्यातील कॅम्प एज्युकेशन सोसायटी त्यांच्या मुळेच नावारूपाला आली. तेथे त्यांनी प्रथम शिक्षक व पुढे प्राचार्य म्हणून काम केले. राजा धनराज गिरजी हायस्कूल व मुलींचे आगरकर हायस्कूल या शाळांच्या स्थापनेत त्यांचा सहभाग होता.
पुणे पालिकेचे काही काळ ते सदस्य होते. ते कॉंग्रेसचे क्रियाशील कार्यकर्ते होते. वर्ष 1933 पासून नाट्यक्षेत्रात व पुढे चित्रपटसृष्टीतही त्यांनी प्रवेश केला. त्यांनी वर्ष 1939 नंतर मुंबईला स्थलांतर केले. वर्ष 1940 मध्ये सुरू केलेल्या साप्ताहिक नवयुगपासून अखेरपर्यंत वृत्तपत्रक्षेत्रातच ते राहिले. याचबरोबरच “अत्रे थिएटर्स’ या नाट्यसंस्थेमार्फत रंगभूमीशीही त्यांचे व्यावसायिक संबंध होते. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांनी आपली वाणी व लेखणी याद्वारे मोठे कार्य केले.
त्यांच्या “श्यामची आई’ या चित्रपटाला पहिले राष्ट्रपती पारितोषिक मिळाले होते. तसेच “महात्मा फुले’ हा त्यांचा आणखी एक चित्रपट राष्ट्रीय पारितोषिकाचा मानकरी ठरला होता. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी अख्खा महाराष्ट्र ढवळून काढला होता. त्यांच्या भाषणांमुळे त्यांनी महाराष्ट्राची अस्मिता जागवली. आचार्य अत्र्यांच्या घणाघाती भाषणांमुळेच संयुक्त महाराष्ट्र मिळाला असे मानले जाते. ते श्रोत्यांना कोटीपूर्ण आणि तत्कालीन राजकारणाचे किस्से सांगून पोट धरून हसवीत. आचार्य अत्रे यांचे भाषण असले की सभागृहे व मैदाने फुलून जायची. 13 जून 1969 रोजी त्यांचे निधन झाले.
– माधव विद्वांस