“ग्रामीण साहित्यिक म. मा. भोसले’ हे वाङ्मय चरित्र पुस्तक डॉ. रामदास रसाळ यांनी लिहिले आहे. मराठी साहित्यातील अनेक लेखक पडद्याआड गेले आहेत. या पुस्तकामुळे नव्या पिढीला एका प्रगल्भ साहित्यकाराची ओळख होईल. म. मा. भोसले यांच्या कथा-कादंबऱ्या स्थाननिष्ठ संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्यांसाठी, जनजातीच्या व उपेक्षित समाज गटांच्या मौखिक व लिखित वाङ्मयीन अभ्यासासाठी महत्त्वाच्या आहेत. तसेच गटागटामध्ये विभागल्या गेलेल्या आपल्या विषमतामूलक समाजरचनेत सामाजिक विचार रुजविण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.
आजच्या समस्याप्रधान जीवनात ज्या अनुभवांना अपरिहार्यपणे सामोरे जावे लागते, त्यांचे अत्यंत वास्तवदर्शन त्यांनी आपल्या कथा-कादंबऱ्यांतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मूलतः कोठलेही स्वतंत्र लेखन हे एक सर्जन असते आणि त्यामुळेच नवनव्या अनुभव स्वरूपानुसार, आशयानुसार रूपरचनेमध्येही प्रायोगिकता आपोआप निर्माण होते.
निसर्ग आणि शेतीवाडी या विषयांवर लेखकाने आपली प्रतिभा समर्पित केली आहे. काळी आई, पाणकळा, शेतीवरील बांध यांचे उल्लेख लेखकाने आपल्या लेखनात केले आहेत. लेखक या पर्यावरणाशी एकरूप होऊन कथा-कादंबऱ्यांतून आपली अनुभूती मोठ्या विश्वासाने लिहिली आहे. ग्रामीण साहित्य आणि चळवळीला मार्गदर्शन व्हावे या हेतूने ते आपले लेखन सतत करीत राहिले.
म. मा. भोसले नुसते कथा-कादंबरीचे लेखक नाहीत तर त्यांची काही ग्रामीण जीवनावर गाजलेली नाटकेही आहेत. “उघड्या जगात’ या कादंबरीवर “जीवाचा सखा’ हा चित्रपट प्रसिद्ध झाला आहे. शिक्षण मालिकेसाठीही त्यांनी लेखन केले आहे. या पुस्तकात कथाभाग प्रथम घेतला आहे. नंतर कादंबरी वाङ्मयाचा भाग आहे.
म. मा. भोसले यांच्या लेखनास प्रारंभ 1936 साली झाला. “आजोबांची डायरी’ ही पहिली कथा. त्यांची पहिली कादंबरी “समरांगण'(1941) मध्ये प्रसिद्ध झाली. या कादंबरीचा जमीनदार सावकार हा नायक आहे. ही कादंबरी नायकाभोवती रुंजी घालणारी आहे. त्याच्या जीवनातील विसंगती त्याच्या बुद्धीला सतत खटकते. त्यांची दुसरी कादंबरी “उघड्या जगात’ ही 1947 ला प्रसिद्ध झाली.
या कादंबरीत श्रीमंत शेतकरी कुळांची कशी पिळवणूक करतो हे दाखविले आहे. “एका आईची लेकरं'(1950), “घसरगुंडी’ (1966), “कायापालट’ (1966) या त्यांच्या कादंबऱ्या. “रक्ताचं नात’ (1951), “पतीचा खून’ (1953), “लाडकी लेक’ (1959) ही नाटके त्यांनी लिहिली.
– शर्मिला जगताप