सद्यस्थितीत “अफवा’ ही आपल्या आयुष्याची एक अविभाज्य बाब बनली आहे. आपल्यापर्यंत येणारी माहिती सत्य की असत्य हे ताडून पाहणे, त्यावर विश्वास ठेवणे किंवा न ठेवणे हा पुढचा भाग. परंतु, अफवा आपल्यापर्यंत पोहोचण्याला आपण अटकाव करू शकत नाही हे खरेच.
रशियामध्ये लोकांनी रस्त्यावर हिंडू नये म्हणून सिंह सोडण्यात आले आहेत, रतन टाटा यांच्या नावे माझा तज्ज्ञांवर विश्वास नाही असा मजकूर असलेला संदेश, अजय देवगण यांच्या कुटुंबीयांना करोना विषाणूचा संसर्ग झाला आहे या आणि अशा अनेक बातम्यांमध्ये माहिती आहे. परंतु, ती बातमी आहे म्हणून ती सत्य आहे असे नाही. वर उल्लेख केलेल्या सगळ्या बातम्या म्हणजे केवळ “अफवा’ होत्या हे सिद्ध झाले आहे. शासकीय वृत्त किंवा संबंधित व्यक्तींनी वेळोवेळी त्याबाबत खुलासा केला आहे.
वर नमूद केल्याप्रमाणे अफवा आपल्यापर्यंत पोहोचणार नाहीत यासाठी आपण काहीही करू शकत नाही. परंतु, तंत्रज्ञानाचा सभान वापर करून त्यापासून स्वतःला दूर ठेवू शकतो. उदाहरणार्थ, व्हॉट्सऍपवर नको ते फोटो डाऊनलोड न करणे, विश्वासार्ह नसलेल्या लिंक्स उगाच न उघडणे, स्वतःला त्रासदायक वाटणाऱ्या अनावश्यक पोस्ट न वाचणे; त्या इतरांपर्यंत न पोहोचवणे, समाजमाध्यमांवर अनावश्यक वेळ न घालवणे असे काही सोपे उपाय आपण नक्की करू शकतो. परंतु, या अफवा नेमक्या कोण आणि का पसरवत असावं? असा प्रश्न आपल्याला पडणे स्वाभाविक आहे. तो प्रश्न पडायलाच हवा. अन्यथा आपण अफवांच्या चक्रातच अडकून पडू.
हा नेमका मुद्दा समजून घेण्यासाठी खोलात जाऊयात. साधारणपणे काही जण समाजाच्या सर्वमान्य आचार पद्धतींशी जुळवून घेत आहेत आणि काहीजण त्या विरोधी वागताहेत असे यावरून आपल्या लक्षात येते. ज्यांचे वर्तन समाज नियमांना धरून नाही त्यांना “समाजद्वेष्टे’ म्हणून आपण मोकळे होतो. पण समाजद्वेष्टे किंवा समाजविरोधी वर्तन म्हणजे नेमके काय हे समजून घेऊयात.
समाजशास्त्रामध्ये यावर भाष्य केले आहे. समाजशास्त्रज्ञ रॉबर्ट मर्टन यांच्या विवेचनामध्ये याबाबत स्पष्टीकरण सापडते. हे थोडे पुस्तकी वाटेल पण ते सर्वांना ठाऊक असावे असेच आहे. आजच्या परिस्थितीतील उदाहरण देऊन पुढे त्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
1. ज्यांना समाजाची उद्दिष्टे आणि ती साध्य करण्याची साधने किंवा मार्ग मान्य असतात ते समाजमान्य आचार पद्धतींशी जुळवून घेतात किंवा त्याला अनुसरून वागतात. (करोनाशी लढ्यात यशस्वी होण्यासाठी स्वस्थ घरात बसणे)
2. काहींना उद्दिष्टे मान्य असतात तर ती साध्य करण्याचे मार्ग मान्य नसतात. (म्हणजे करोनाला पळवून लावायचे हे मान्य आहे परंतु, त्यासाठी घरात बसणे मान्य नाही)
3. काहींना उद्दिष्टे साध्य करण्याचे पारंपरिक मार्ग मान्य असतात पण उद्दिष्टेच मान्य नसतात. (घरात बसणे मान्य आहे परंतु करोना एका महिन्यात जाईल का, ते कसं शक्य आहे, याची खात्री काय, असे प्रश्न विचारून उद्दिष्ट नाकारायचे आहे)
4. काहींना उद्दिष्टे आणि मार्ग दोन्हीही मान्य नसतात. (करोनाला पळवून लावणे हा ज्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा नाही आणि म्हणून घरात बसणेही त्यांना मान्य नाही. थोडक्यात, समाजात जे घडते त्याचा आपल्यावर कोणताही परिणाम होणार नाही ही वृत्ती होय)
5. शेवटच्या प्रकारातील लोक उद्दिष्टे, ती साध्य करण्याचे मार्ग दोन्हीही नाकारतात आणि स्वतःच्या परीने पर्याय म्हणून नवी उद्दिष्टे आणि मार्गांचा शोध घेतात (करोनाला पळवून लावणे, घरात बसणे, सुरक्षित राहणे यांपैकी काहीही मान्य नाही. असे लोक समविचारी लोकांचे गट तयार करून त्यांच्या अनावश्यक अस्मिता जाग्या करण्यासाठी समाजमाध्यमे किंवा तत्सम अनेक मार्ग वापरतात. म्हणजेच, उद्दिष्ट वेगळे आणि मार्गही वेगळे)
या पाचव्या प्रकारातील माणसे बंड करून उठण्याच्या (कधीकधी ते अकारणही असू शकते) वृत्तीची असतात. म्हणजे समाजात जे काही घडते आहे त्याचा आपण भाग नाही असे मानून हे लोक या ना त्या प्रकारे त्यात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करतात, विरोधी कृती करतात. त्यांचे हेतू काहीही असू शकतात. साऱ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेणे, शासनाच्या कामात व्यत्यय आणणे, बेकायदेशीर कृत्य करणे, सामान्य लोकांमध्ये घबराट निर्माण करणे, समाजात फूट पाडणे, लोकांची दिशाभूल करणे किंवा निनावी राहून रिकामा वेळ घालवणे. अशा माणसांकडून प्रसंगी समाजविरोधी कृती घडते. अफवा पसरवणे देखील त्यांपैकीच एक आहे.
समाजशास्त्रानुसार असे वर्तन विकृत मानले जाते. आपल्याला अशा विकृतीपासून सावध रहायचे आहे. सजग आणि सुरक्षित रहायचे आहे. नागरिक म्हणून हे कर्तव्य आपण घरबसल्या बजावायचे आहे.
– देवयानी देशपांडे