अमोल मतकर
संगमनेर – तालुक्यातील खांडगाव, निमज, धांदरफळ या भागात नदीपात्रातून रात्री राजरोस अवैध वाळू उपसा सुरू आहे. तसेच या वाढूचा साठा करून ती दुप्पट दराने विकली जात आहे. गुटखा माफियांनीही सध्या तोंड वर काढले असून, तेही अव्वाच्या सव्वा भावाने चोरट्या मार्गाने गुटख्याची विक्री करत आहेत. त्यामुळे लाकडाऊनच्या काळात वाळू तस्कर व गुटखा माफिया आपले उखळ पांढरे करीत असल्याचे चित्र आहे.
संगमनेर तालुक्यात प्रवरेच्या काठावर असणाऱ्या गावांमधून छुप्या मार्गाने वाळू तस्करी करून, वाढीव दराने पुरवठा केला जात आहे. तालुक्यातील खांडगाव, निमज, धांदरफळ या भागातून प्रवरा नदीपत्रातून रात्रभर मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी चालू आहे. वाळूतस्करांनी थेट नदीपात्रात उतरण्यासाठी रस्ते तयार करून ठेवले आहेत. रात्री उशिरापासून पहाटेपर्यंत हे तस्कर अवैधरित्या वाहतूक करून ज्याठिकाणी बांधकाम चालू आहे त्याठिकाणी वाळू पोहोच करतात. विशेष म्हणजे गेल्या महिनाभर प्रवरा नदीला पाणी असताना पाण्यातून रात्री वाळू काढून नदीपात्राच्याच कडेला मोठा ढीग घालून दुसऱ्या वाहनाने त्याची वाहतूक करण्यात येत आहे. वाळूतस्कर वाळूसाठा करून दुप्पट भावाने त्याची विक्री करत आहेत.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जिल्हाभर खासगी, शासकीय कार्यालये बंदचे आदेश दिले आहेत.
जिल्हा न्यायालयाचे कामकाज मर्यादित वेळेत आटोपले जाते. गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाकडून शक्य तेवढ्या उपाययोजना केल्या जात आहेत. सर्वसामान्य नागरिकांनाही घराबाहेर पडू दिले जात नाही. हीच संधी वाळूमाफियांनी हेरली आहे. त्यामुळे तालुक्यातील बऱ्याच भागात मनमर्जीने अवैध वाळूची वाहतूक सुरु आहे. त्यामुळे प्रवरा नदीचे पात्र वाळू माफियांसाठी कुरण बनले आहे. दुसरीकडे लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तात गुंतल्यामुळे गुटखा माफियाही दुप्पट, तिप्पट दराने गुटख्याची विक्री करून आपले उखळ पांढरे करत आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे
कोवीड -19 कोरोनाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व महसूल सह अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश दिलेले असताना ग्रामीण भागात वाळूतस्कर वाळूचा, गुटखा माफिया गुटख्याची तस्करी करतात कसे? जर अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहत असतील, तर माफिया आणि यांचे लागेबांधे आहेत अथवा या अधिकारी कर्मचाऱ्यांना सद्यस्थितीची जाणीव नसल्याची मोठी चर्चा आहे. याबाबत तहसीलदारांनी किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतःच जातीने लक्ष घालून संबधित सज्जांच्या तलाठ्यांना या गोष्टीवर नियंत्रण मिळविण्याचे आदेश देण्याची गरज नागरिकांमधून व्यक्त होत आहे