डॉ. संजय वर्मा
सुरुवातीला स्टार्टअप कंपन्यांत मोठी गुंतवणूक करण्यात आली. मात्र, या क्षेत्रातून फारसा फायदा होत नसल्याचे पाहून गुंतवणूकदार आपली गुंतवणूक काढून घेत आहेत. त्यामुळे सध्या स्टार्टअप कंपन्यांवर मोठे संकट ओढवले आहे.
काही काळापूर्वी सॉफ्ट आणि पांढरपेशी समजली जाणारी नोकरी ही आतासारख्या हायटेक नोकरीप्रमाणे नसायची. आजघडीला कोणताही युवक घ्या तो संगणक, आयटी, मॅनेजमेंटसह प्रत्येकजण उत्पादनाऐवजी सेवा क्षेत्रात जाण्याची इच्छा बाळगून आहे. विद्यापीठ आणि व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या संस्थांमध्ये अशा प्रकारच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी आहे. या संस्थेतून आयटी किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा बीपीओसारख्या सेवा क्षेत्रासाठी पात्र मुले तयार केली जात आहेत. आयआयटी, आयआयएमसह अनेक मोठ्या संस्था (विशेषत: खासगी) यांच्याकडून केले जाणारे दावे पालकवर्गांना आकर्षित करतात. फेसबुक, ऍमेझॉन किंवा ट्विटर, गुगल यासारख्या नामांकित कंपन्या आणि स्टार्टअपमध्ये लाखो, कोटी रुपयांचे पॅकेज मिळाल्याचे सांगतात. पण आता स्थिती बदलत चालली आहे.
कोट्यवधींचे पॅकेज देणाऱ्या या कंपन्यांकडून तरुणाच्या स्वप्नांना धक्के दिले जात आहेत. ट्विटर किंवा फेसबुकचे उदाहरण घ्या. 90 टक्के कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखविला आहे यापैकी बहुतांश कर्मचारी आयटी आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंगशी निगडीत आहेत. ट्विटरबरोबरच फेसबुकची मालकी असलेल्या “मेटा’ कंपनीकडून देखील असाच अनुभव आला. तत्पूर्वी काही आयटी कंपन्यांनीही अशा प्रकारचे धोरण अंगिकारले.
करोनाकाळानंतर जग आता पूर्वपदावर येऊ लागल्याने अनेक व्यवसाय-उद्योगांना चांगला दिलासा मिळाला आहे. मात्र, सर्वच ठिकाणी असे चित्र नाही. अनेक स्टार्टअप कंपन्यांपुढे आपला व्यवसाय वाचविण्याचे आव्हान आहे. यात अनेक कंपन्या शैक्षणिक अभ्यासक्रमाशी, कोचिंग आणि आयटीशी संबंधित आहेत. तसेच ऑनलाइन फूड डिलिव्हरीचा देखील यात समावेश आहे. करोना काळात स्टार्टअप कंपन्यांचे काम आणि उत्पन्न वाढले. घरबसल्या या कंपन्यांनी ग्राहकांना सेवा दिली. मात्र, आता करोनाचा परिणाम कमी झाल्याने या कंपन्यांचे काम कमी झाले.
ट्विटर कंपनीने गेल्या महिन्यांत अनेक कर्मचाऱ्यांना नारळ दिल्याने माहिती तंत्रज्ञान जगाला धक्का बसला. अशा प्रकारची कारवाई करणारी ट्विटर ही पहिलीच कंपनी नाही. मायक्रोसॉफ्टने गेल्या महिन्यात म्हणजे ऑक्टोबर 2022 मध्ये एक हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय जाहीर केला. त्याबरोबर राइडशेअर कंपनी लिफ्ट (एलवायएफटी) ने देखील 13 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली. पेमेंट प्रोसेसिंग फर्म-स्ट्राइपने 14 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला. दिग्गज ई-कॉमर्स कंपनी ऍमेझॉन आणि गुगलची पालक कंपनी “अल्फाबेट’ ने नव्या भरतीवर स्थगिती आणली. नवोन्मेष उद्योग (इनोव्हेटिव्ह इंडस्ट्री किंवा न्यू एज बिझनेस) च्या श्रेणीत असलेल्या ज्या स्टार्टअप कंपन्यांकडे अनेक वर्षांपासून रोजगारनिर्मितीचे साधन म्हणून पाहिले जात होते, त्याच कंपन्या अडचणीत आल्या आहेत. कर्मचारी कपात आणि नवीन भरतीवर स्थगिती देणाऱ्या कंपन्यांत इन्फोसिसचा देखील समावेश आहे. या कंपन्यांनी मूनलायटिंगचा गाजावाजा करत आपल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काम करत असल्याचा ठपका ठेवत त्यांना नोकरीवरून काढून टाकले.
स्टार्टअप कंपन्यांचा विचार केल्यास या वर्षीच्या प्रारंभापासूनच देशातील स्टार्टअप कंपन्यांनी 12 हजार कर्मचाऱ्यांना कमी केले. यावरून या क्षेत्रातील कठीण काळ लक्षात येईल. अशा प्रकारची कपात ही यूनिकॉर्न समजली जाणारी आणि भविष्यात भरभराटीचे संकेत देणाऱ्या कंपन्यांत झाली. जसे ऑनलाइन कोचिंग क्लास देणारी बायजू, वेदांतू, अनऍकडेमी, लिडो लर्निंग अशी नावे पटकन डोळ्यासमोर येतात. पहिल्या सहा महिन्यांत नोकरी गमावणाऱ्यांची संख्या 22 हजार आहे. मात्र, यातील चिंताजनक बाब म्हणजे त्यापैकी 60 टक्के तरुण हे भारतीय आहेत. या वर्षाखेरीस स्टार्टअपमधील सुमारे 50 ते 60 हजार युवकांना घरी पाठवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्टार्टअप कंपन्यांत गुंतवणूक करणारी मंडळी ही या क्षेत्रातून फारसा फायदा होत नसल्याचे पाहून आपली गुंतवणूक काढून घेण्याबाबत विचार करत आहेत. त्याचबरोबर नवीन गुंतवणूकदारांनी देखील हात आखडता घेतला आहे.
करोना काळात गुंतवणूकदारांनी संयम पाळला, परंतु आता स्थिती पूर्वपदावर आल्याने स्टार्टअप कंपन्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ होताना दिसून येत नाही. या कारणांमुळेच करोना काळ थांबताच जगात अनेक स्टार्टअप कंपन्या नावारूपास आल्या. त्यांच्या आगमनाने प्रस्थापित कंपन्यांना आव्हान निर्माण झाले. फेसबुकला पूर्वीपासूनच इन्स्टाग्राम, यूट्यूब यासारख्या सोशल मीडियाकडून जोरदार टक्कर मिळत आहे. 18 वर्षे जुनी असणाऱ्या फेसबुकचे कोट्यवधी युजर्स टिकटॉक, इन्स्टाग्राम, यूट्यूबकडे वळले गेले. या कारणांमुळे फेसबुकच्या उत्पन्नात घसरण झाली आहे. त्यामुळे फेसबुकच्या शेअरमध्येही घसरण झाली आहे. हा बदल पाहता कंपन्यांनी नवीन भरतीला लगाम घातला आणि कपातीचे धोरण अवलंबिले. अलीकडेच मेटा (फेसबुक) कंपनीने 11 हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा केली.
वास्तविक बहुतांश टेक कंपन्यांसमोर नवीन आव्हानांचा सामना करणे आणि भांडवल उभारणे हेच मोठे आव्हान आहे. या कारणामुळे गुंतवणूकदारांना या क्षेत्रात ठोस उत्पन्न मिळण्याची हमी मिळताना दिसून येत नाही. टेक कंपन्या कोंडीत सापडल्याचेच संकेत मिळत आहेत. म्हणूनच ट्विटरचे नवे मालक मस्क यांनी म्हटले, की भविष्यात ट्विटर कंपनी दिवाळखोरीत निघाली तर आश्चर्य वाटणार नाही. केवळ आयटी किंवा सोशल मीडिया कंपनीच नाही, ऑनलाइन कोचिंगच नाही तर ओला ऍपसारख्या टेक आधारित टॅक्सीसेवा आणि क्रिप्टोकरन्सीसारखा व्यवसाय करणाऱ्या स्टार्टअप जेमिनी, वाल्ड, बिटपांडा यांच्यासाठी देखील धोक्याचा इशारा आहे.
विशेष म्हणजे भारत सरकारने यावर्षीच्या प्रारंभी मोठा गाजावाजा करत देशात 60 हजार स्टार्टअप कंपन्या सुरू झाल्याचे जाहीर केले. मात्र, आता टेक कंपन्या अडचणीत आल्या. एवढेच नाही तर भारतात दर दोन ते तीन आठवड्यांत नवीन यूनिकॉर्न येत असल्याचे सांगितले गेले. यूनिकॉर्न म्हणजे ज्यांचे भांडवल 1 अब्ज डॉलर (सुमारे 80 अब्ज रुपये) पेक्षा अधिक आहे. अशा प्रकारचे दावे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: केले आहेत.
मात्र, या दाव्यानंतर एप्रिल महिन्यात एकही नवीन यूनिकॉर्न कंपनी समोर आली नाही. तसेच यावर्षी मार्च, एप्रिल या महिन्यांत भारतीय स्टार्टअप कंपन्या जागतिक बाजारात 5.8 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे साडेचार-पाच खर्व रुपयांचे भांडवल उभारू शकली. हे भांडवल गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 15 टक्क्यांपेक्षा कमी आहे.
2016 पासून देशात स्टार्टअप योजना सुरू करण्यात आली आणि त्यास करोना काळात झटका बसला. करोना काळामुळे 70 टक्के स्टार्टअप अडचणीत आले आणि त्यापैकी 12 टक्के तर सुरुवातीलाच बंद पडले. ट्विटरपासून ते फेसबुकची स्थिती पाहता टेक कंपन्यांतील सुवर्णकाळ अस्तंगत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.