पिंपरी – शहर म्हणजे फक्तस्मार्ट सिटी नको, तर नागरिकांना मुलभूत सुविधाही मिळायला हव्यात. त्यामध्ये प्रामुख्याने पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक सुविधा, सुरक्षा, गरीबांसाठी अल्प दरात शालेय शिक्षण आणि वैद्यकीय सुविधा, पदपथांवरील अतिक्रमणे हटविणे आवश्यक आहे, अशी भूमिका पिंपरी-चिंचवड गृहनिर्माण सहकारी संस्था फेडरेशनने घेतली आहे.
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत पत्रव्यवहार करण्यात येणार आहे, अशी माहिती फेडरेशनचे सरचिटणीस के. सी. गर्ग यांनी दिली. महापालिका पिंपरी-चिंचवड “स्मार्ट सिटी’ करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करीत आहे. मात्र, ही कार्यवाही करताना नागरिकांना हव्या असलेल्या मुलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केले जात आहे. शहरात सोसायटीधारकांना पाण्याचा प्रश्न बऱ्याच दिवसांपासून भेडसावतो आहे. याबाबत महापालिका प्रशासनासमवेत वारंवार बैठका झाल्या. मात्र, हा प्रश्न सुटलेला नाही. शहरात ठिकठिकाणी पावसामुळे रस्ते
खराब झाले आहेत. त्यांची सुधारणा व्हायला हवी.
वाकड परिसरामध्ये रस्त्यावर, पदपथांवर अतिक्रमणे वाढली आहेत. त्यामुळे सोसायटीतील रहिवाशी, नागरिक यांना येथून ये-जा करणे अवघड जात आहे. महापालिका नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कर आकारते. मात्र, त्या तुलनेत आवश्यक मुलभूत सुविधांची पूर्तता केली जात नाही. पर्यायाने, सामान्य नागरिकांचा असंतोष वाढतो आहे. महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आहे. त्याबाबत लक्ष देणे आवश्यक आहे. वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. विविध चौकांतील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा कशी होईल, या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे. रस्ते आणि पदपथांवर होणारे अतिक्रमण रोखणे आवश्यक आहे, असे मत गर्ग यांनी व्यक्त केले.