पुणे – भारतीय संघाचा स्टार फलंदाज व रॉयल चॅलेंजर बेंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहली सातत्याने अपयशी ठरत असला तरीही त्याची आम्हाला चिंता नाही, तो लवकरच या कालखंडातून बाहेर येईल, असा विश्वास बेंगळुरूचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी व्यक्त केला आहे.
कोहलीला यंदाच्या आयपीएल स्पर्धेत धावांसाठी झगडावे लागत आहे. मात्र, त्याच्या कामगिरीची चिंता नसून त्याला लवकरच सूर गवसेल. कोहली लवकरच दमदार पुनरागमन करेल. कोहली महान फलंदाज आहे. कठीण परिस्थितीतून बाहेर कसे पडायचे हे त्याला चांगलेच अवगत आहे. त्याच्या धावा होत नसल्या, तरी त्याचा आत्मविश्वास खालावलेला नाही. त्याला लवकरच सूर गवसेल, असेही बांगर म्हणाले.
सरावादरम्यान प्रयोग करण्यासाठी कोहली मागे हटत नाही. तो मेहनती आहे आणि सरावातही तो कठोर मेहनत घेत आहे. एक चांगली खेळी त्याला मोठ्या खेळीचा आत्मविश्वास मिळवून देईल, असेही बांगर म्हणाले.
बांगर यांच्यापूर्वी भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही कोहलीला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. आता बांगर यांनीही विश्वास व्यक्त केला असला तरीही त्यांच्या मते कोहलीने ब्रेक घेण्याची गरज नसल्याचे सांगत शास्त्री यांच्या विधानावर आश्चर्य व्यक्त केले आहे. ब्रेक घेऊन कोणीही चांगली कामगिरी होण्याची ग्वाही देणार नाही. कोहलीने खेळत राहिले पाहिजे तरच त्याला आत्मविश्वास मिळवून देईल, असे बांगर यांनी सांगितले.