मुंबई : राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्याच्या दसऱ्या मेळाव्याच्या भाषणासोबतच राज्य सरकारवरदेखील सडकून टीका केली आहे. अजित पवार यांनी शिंदेंच्या बीकेसीमधील दसरा मेळाव्यातील भाषणापासून ते निधी वाटपामधील भेदभावासारख्या विषयावर भाष्य केले. इतकचं नाही तर कोणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेले नाही असे सांगताना शिंदेंनाही घरी जावं लागेल असं विधान अजित पवारांनी केले आहे.
कोल्हापूरमध्ये अजित पवार बोलत होते त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि राज्य सरकार यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी बोलताना,“अजित पवार सत्ता गेली म्हणून ओरडतोय असं वाटेल. पण तसं नाहीय. सत्ता येते, सत्ता जाते. आम्ही सत्तेसाठी हापहापलेले नाही आहोत. जी जबाबदारी जनता देईल ती आम्ही पार पाडू. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर तिथं भाषण करत असताना सारखं ‘ही लोक बसलेली आहेत ती आपणहून आली आहेत,’ असं ते (मुख्यमंत्री) म्हणत होते. अरे निम्मी तर तुमच्या भाषणात निघून गेली. मग कशी आपणहून आली? खुर्चा मोकळ्या झाल्या. आपणहून आलेल्या लोकांनी खुर्च्या मोकळ्या का केल्या?” असे प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केले. त्याचप्रमाणे, “काही त्या टीव्हीवाल्यांनी विचारलं कशाला आलात? त्यावर कशाला आलोय कुणाला माहिती. चहा नाही, पाणी नाही, जेवण नाही, काहीच नाही असं ते लोक सांगत होते,” असेही अजित पवार यांनी म्हटले.
या मेळाव्यासाठी राज्यातील वेगवगेळ्या भागांमधून लोकांना आणण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र यामुळे ग्रामीण भागात बसचा तुटवडा जाणवला असेही अजित पवार म्हणाले. “१० कोटी रुपये तुम्ही एसटीला भरता. कुठून आले १० कोटी रुपये? तुम्ही गावच्या एसटी तिकडे आणल्यात. एसटी रद्द कराव्या लागल्या ग्रामीण भागात. त्यांना एसटी मिळाल्या नाहीत त्या दिवशी. यासाठी तुम्ही मुख्यमंत्री झालात का?” असा प्रश्न अजित पवारांनी विचारला.
मुख्यमंत्री शिंदेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणामध्ये महाराष्ट्राच्या वाटचालीसंदर्भातील मुद्दे आवश्यक होते असंही अजित पवार यांनी म्हटलं. “वाचूनच भाषण सुरु होतं. असं नाही चालत. शिंदेसाहेब हा महाराष्ट्र आहे. देशातील एक प्रगत राज्य आहे. असं असताना तुम्ही महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून उद्या कोणत्या दिशेने नेणार आहात ते सांगायला हवं होतं,” असं मत विरोधी पक्ष नेत्यांनी व्यक्त केलं.
शिंदेंचे भाषण इतका वेळ चाललं की लोक उठून निघून गेले असा टोला अजित पवार यांनी लगावला. “कालचं तर भाषण काय चाललं होतं. दीड तास भाषण केलं. एक तास २४ मिनिटं भाषण झालं. शेवटी लोक उठून जायला लागल्यामुळे थांबावं लागलं. नाहीतर किती तास केलं असतं कुणाला माहिती. कारण पहिल्यांदात इतकी लोक दिसली म्हणून बळच भाषण. मला टीका करायची नाही पण वस्तूस्थिती आहे. मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला समोरुन प्रतिसाद मिळत नव्हता. पण उद्धव ठाकरेंच्या भाषणाला प्रतिसाद मिळत होता,” असे अजित पवार म्हणाले.
याच भाषणामध्ये अजित पवार यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये निधीच्या बाबतीत भेदभाव होता कामा नये अशी अपेक्षा व्यक्त केली. “सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला ५० कोटीची कामं दिली तर विरोधी पक्षाच्या आमदाराला २५ कोटीची तरी कामं दिली पाहिजेत. या असल्या गोष्टी कोणी करायला लागलं तर कुणीही ताम्रपट घेऊन जन्माला आलेलं नाही हे लक्षात ठेवावं,” असे अजित पवार म्हणाले.