पिंपरी, दि. 7 (प्रतिनिधी) – नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी गणेशोत्सवात नदी पात्रात मूर्ती आणि निर्माल्याचे विसर्जन महापालिकेने करू दिले नाही. मात्र त्यानंतर महापालिकेला पर्यावरणाचा विसर पडल्याचे दिसून आले. नवरात्रीनंतर घरोघरी जमा झालेले निर्माल्य नागरिकांनी थेट नदीपात्रात विसर्जित केल्याचे दिसून आले आहे. महापालिकेने गेल्यावर्षी करोनामुळे विसर्जन घाटावर अथवा हौदात गणेशमूर्ती विसर्जित करण्यास महापालिकेकडून मनाई करण्यात आली होती. पर्यावरणाच्या रक्षणासाठी नागरिकांना ही सवय लागावी, यासाठी यंदाही नदीपात्रत गणेश मूर्ती अथवा निर्माल्य विसर्जन करण्यास महापालिकेने मनाई केली होती. महापालिकेने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे बहुतांश नागरिकांना आणि मंडळांना विसर्जन हौदातच गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. यामुळे पर्यावरण प्रेमींनी महापालिकेच्या या निर्णयाचा तोंड भरून कौतुक केले होते.
गणेशोत्सवात कौतुकास्पद उपक्रम राबविणाऱ्या महापालिकेला नवरात्रीमध्ये मात्र पर्यावरणाचा विसर पडला आहे. नवरात्रीमध्ये बहुतांश घरांमध्ये नवरात्रीत घट बसविण्यात येतात. या घटाला दररोज फुलांचा हार घालण्यात येतो. दसरा किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी हे घट आणि निर्माल्य नदीपात्रात विसर्जित केले जातात. याबाबत माहिती असूनही महापालिका प्रशासनाने याबाबत कोणतीही उपाययोजना केली नाही.
अनेक नागरिकांचा सूज्ञपणा
नदी प्रदूषणाबाबत जागृत असलेल्या काही नागरिकांनी घरातील घट व निर्माल्य विसर्जित करण्यासाठी नदीतीरावर आणले. मात्र हे निर्माल्य नदीपात्रत विसर्जित न करता ते गणेश मूर्ती विसर्जनासाठी तयार केलेल्या हौदात व कठड्यावर ठेवले. यामुळे विसर्जन हौद या साहित्यांनी भरून गेला होता.
निर्माल्य कुंड गायब
यापूर्वी शहरातील विविध भागात नदीच्या पुलालगत महापालिकेच्यावतीने निर्माल्य कुंड ठेवण्यात आली होती. या कुंडातील निर्माल्य वेळोवेळी उचलून ते खत निमिर्तीसाठी पाठविण्यात येत होते. मात्र कालांतराने हे निर्माल्य कुंड गायब झाले. ही निर्माल्य कुंड पुन्हा बसवावीत, अशी मागणी पर्यावरण प्रेमी नागरिकांकडून होत आहे. यामुळे नागरिकांनी पुन्हा नदीपात्रत निर्माल्य टाकण्यास सुरवात केली. हा प्रकार टाळण्यासाठी महापालिकेने नदीवर असलेल्या पुलाला उंच जाळ्या लावल्या. मात्र आजही काही नागरिक उंच जाळ्यावरून प्लास्टीकच्या पिशवीतून निर्माल्य नदीत टाकतात.
गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रीमध्येही निर्माल्य जमा करण्यासाठी महापालिकेने व्यवस्था केली होती. त्यामुळे शहरात कोठेही नदीपात्रत निर्माल्य विसर्जित झालेले नाही. तसेच नदीवरील पुलालगत यापूर्वी निर्माल्य कुंड ठेवण्यात आले होते. मात्र नागरिक त्यामध्ये कचरा टाकत असल्याने सध्या कुठेही निर्माल्य कुंड ठेवण्यात आलेली नाहीत.
– गणेश देशपांडे, आरोग्य कार्यकारी अधिकारी-पिंपरी चिंचवड महापालिका