जळगाव – जी-20 डिनरच्या निमंत्रणात राष्ट्रपतींना “भारताचे राष्ट्रपती” असे संबोधले गेले आहे त्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेचे अध्यक्ष शरद पवार यांनीही केंद्रावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हटले आहे की देशाचे नाव बदलण्याचा अधिकार कोणालाही नाही.
देशाशी संबंधित नावावर सत्ताधारी पक्ष का अस्वस्थ आहे हे मला समजत नाही,अशी टिप्पणी त्यांनी आज पत्रकारांशी बोलताना केली.सरकार राज्यघटनेत देशाचे नाव बदलणार आहे का, असे विचारले असता पवार म्हणाले की, मला याबाबत कोणतीही माहिती नाही.तथापि असे अचानकपणे कोणीही देशाचे नावच बदलू शकत नाही.
हेही वाचा – हिंदुस्थानचे नाव “भारत” आणि “इंडिया” कसे पडले? तुम्हला माहित आहे का? जाणून घ्या इतिहास…
या विषयावरून आज दिवसभर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रतिक्रीया दिल्याने या विषयाला गंभीर वळण लागले आहे. इंग्रजीत भारताला इंडिया म्हणतात आणि तसा उल्लेख देशाच्या घटनेतही आहे याचेही दाखले दिले जाऊ लागले आहेत.
मोदी सरकारने बोलावलेल्या विशेष संसदीय अधिवेशनात देशाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव येऊ शकतो असेही सांगितले जाऊ लागले आहे. विरोधी पक्षांच्या आघाडीने आपले नाव इंडिया असे ठेवले आहे, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी म्हणून ही कृती केली जात आहे असेही सांगितले जाऊ लागले आहे.