PM Narendra Modi | Lok Sabha Election 2024 । देशातील लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा ७ मे रोजी पार पडणार आहे. त्यासाठी राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचा धडाका सुरु आहे. काल दिवसभरात ३ सभा घेतल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची धाराशिव आणि लातूर मध्ये देखील सभा पार पडली. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. तसेच इंडिया आघाडी ही भारताला अस्थिरतेकडे – अराजकतेकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप केला.
राज्यातल्या लोकसभा निवडणुकीचे दोन टप्प्यांचं मतदान पार पडलंय. मात्र आता राज्यात सर्व पक्षांनी सभांचा धडका सुरु केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील दोन दिवसांमध्ये सहा सभा घेतल्या आहेत. भाजप उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांच्या प्रचार सभेसाठी आज मोदी लातूर मध्ये आले होते.
नरेंद्र मोदी म्हणाले, “इंडिया आघाडीतील लोक देशाचे पंतप्रधानपद खंडाखंडाने देणार आहेत. प्रत्येक वर्षी नवा पंतप्रधान देण्याची त्यांची घोषणा आहे. भारताला खंडाखंडात विभागून टाकणारे लोक आता, भारत देशाच्या पंतप्रधानपदही हे खंडाखंडाने देणार आहेत.
इंडिया आघाडीची ही देशाला लुटण्याची योजना आहे. अशा लोकांना तुम्ही संधी देऊ शकाल का? भारताला पुन्हा अस्थिरतेकडे घेऊन जाणार आहोत का? असा सवाल मोदींनी केला.
मोदी पुढे म्हणाले, “काँग्रेसची नजर तुमच्या संपत्तीवर असल्याचं सांगत नरेंद्र मोदी म्हणाले की, तुमच्या मुलांसाठी सोडून जाणाऱ्या संपत्तीचे वाटपही ते करणार आहेत. आपण आपल्या मुलांसाठी कष्ठ करतो आणि संपत्ती मुलांसाठी सोडून जातो. मृत्यूनंतर आपल्या मुलांसाठी काही ना काही देतो.
पण काँग्रेस आता त्यामध्येही अर्धी संपत्ती लुटणार आणि त्यांच्या व्होट बँकेमध्ये वाटप करणार. त्यामुळेच काँग्रेस देशात आता वारसा हक्क कायदा लागू करण्याची भाषा करतेय. काँग्रेस पार्टीच्या शाही परिवारने स्वतःच्या मुलांसाठी कोणती जाहगीर सोडली आहे? साठ वर्षांमध्ये ते गरिबीशिवाय काही देऊ शकले नाहीत. असं देखील नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.