मैनपुरी (यूपी) – भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेवर आल्यास देश पंधरा वर्ष मागे जाईल असा इशारा समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांनी दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, लोकांच्या खऱ्या प्रश्नावरील लक्ष अन्यत्र विचलीत करण्यासाठीच भाजप नेहमी विभाजनवादी राजकारण करीत असते असेही त्यांनी म्हटले आहे. (If BJP comes back to power, country will go back 15 years – Dimple Yadav)
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या. पण भाजपचे मनसुबे लोकांच्या ध्यानात आले असून ते यावेळी परिवर्तनाच्या बाजूने मतदान करतील असा दावाही त्यांनी केला.
भाजपचे नेते जातीच्या आधारावर लोकांना भडकवतात, त्यांच्या भावनांशी खेळतात आणि मूळ मुद्द्यांवरून लक्ष वळवतात,असे त्या म्हणाल्या.या सगळ्या वातावरणात लोकांना बदल हवा आहे त्यामुळे ते यावेळी परिवर्तनासाठी मतदान करत आहेत. भाजपच्या ‘दबाव की राजनीती’मुळे समाजातील प्रत्येक घटक मेटाकुटीला आला आहे.
जनतेला सर्व स्तरातून त्रास सहन करावा लागत आहे असे त्या म्हणाल्या. महागाई शिगेला पोहोचली आहे आणि सरकारी योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचत नाही. लोकांना फक्त आश्वासने दिली गेली, पण प्रत्यक्षात काहीच मिळाले नाही,असे त्या म्हणाल्या.देशाचे स्थान कुपोषण आणि उपासमारीच्या निर्देशांकात खूप खालावले आहे ही सरकारचीच नाकामी आहे असे त्या म्हणाल्या.