नवी दिल्ली – विरोधकांनी आपल्या सामायिक आघाडीला भारत असे नाव दिल्याने यावर राजकारण सुरू झाले आहे. भाजप नेत्यांनी इंडियाबाबत केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर आता पक्षाच्या खासदारांनीही इंडियाऐवजी भारत असा औपचारिक वापर करण्यास सुरुवात केली आहे. भाजप खासदार हरनाथ सिंह यादव यांनी तर इंडिया हा शब्द ब्रिटिशांची शिवी असल्याचे म्हंटले आहे. तर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही भारताबाबत ट्विट केले आहे.
काय म्हणाले भाजप खासदार हरनाथ यादव?
भाजप खासदार हरनाथ सिंह यादव म्हणाले की, यावेळी संपूर्ण देश इंडियाऐवजी भारत हा शब्द वापरावा, अशी मागणी करत आहे. इंडिया हा शब्द आपल्याला ब्रिटिशांनी दिलेल्या शिव्यासारखा होता, तर भारत हा शब्द आपली संस्कृती दर्शवतो. आपल्या संविधानातही बदल झाला पाहिजे आणि त्यात भारत शब्द जोडला पाहिजे.
ते पुढे म्हणाले, “ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये भारत हा गरीब आणि अशिक्षित लोकांचा देश असल्याचे वर्णन केले आहे. ब्रिटिशांनी मुद्दाम गुलाम देशाचा संबंध इंडियाशी जोडला. आपल्या राज्यघटनेच्या लेखकांच्या संदर्भात मला असे म्हणायचे आहे की संविधानात भारत आणि इंडिया दोन्ही नावं ठेवणं ही चुक होती.
काय म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
दुसरीकडे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही त्यांच्या X वरच्या पोस्टमध्ये भारत या शब्दावर जोर देत ‘रिपब्लिक ऑफ इंडिया’ या शब्दाऐवजी ‘रिपब्लिक ऑफ भारत’चा वापर केला आहे. ते म्हणाले की आमची सभ्यता आता वेगवान आणि निर्भयपणे अमृत कालाकडे वाटचाल करत आहे याचा आम्हाला आनंद आणि अभिमान आहे.
दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुघ म्हणाले, “भारत बोलण्यात आणि लिहिण्यात अडचण का आहे. आपल्या देशाचे नाव भारत हे पुरातत्व कालखंडात आहे आणि ते घटनेतही स्पष्ट करण्यात आले आहे. विनाकारण आणि जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करणे हे दुर्दैवी आहे.”
हे नाव आमच्या पूर्वजांनी दिले होते – लेखी
केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी म्हणाल्या की, भारताची राज्यघटना सांगते की india that is bharat आणि संविधान भारताला प्राधान्य देते. आपल्या मातृभूमीला भारत हे नाव आपण दिलेले नाही, ते आपल्या पूर्वजांनी दिले आहे. विष्णु पुराणातील एका श्लोकात लिहिले आहे, ‘उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रेशैव दक्षिणम्। वर्षां तद भारतम् नाम भारती यात्र सन्ततिः’ म्हणजे समुद्राच्या उत्तरेस आणि हिमालयाच्या दक्षिणेस असलेल्या भूमीचे नाव भारत आहे. त्यात राहणाऱ्या लोकांची नावे भारतीय आहेत. आता विष्णुपुराणावर कोणाचा काही आक्षेप आहे का?