आझाद मैदानावर मराठा आंदोलकांची घेतली भेट
मुंबई – मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा समाजाच्या तरुणांचे 27 दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. मात्र, अजूनही तरुणांना नियुक्त्या न मिळणे हे दुर्देवी आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सकल मराठा समाज पुरस्कृत एसईबीसी आणि ईएसबीसी उमेदवारांचे आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. मराठा आरक्षण महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 62/2018 मधील कलम 18 नुसार मराठा उमेदवारांना नियुक्ती मिळावी या मागणीसह अन्य मागण्यांसाठी हे तरुण आंदोलनाला बसले आहेत. या आंदोलकांची भाजप नेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर आणि नितेश राणे यांनी आज आझाद मैदान येथे जाऊन भेट घेतली. यावेळी आंदोलकांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.
फडणवीस म्हणाले, मराठा समाजाच्या उमेदवारांच्या नियुक्तीबाबत आम्ही वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर कलम 18 चा समावेश केला. सगळ्या मराठा उमेवारांना नियुक्त्या मिळाव्यात यासाठी कायदे केले. उच्च न्यायालयाने हा कायदा वैध ठरवला. सर्वोच्च न्यायालयाने या कायद्याला स्थगिती दिली नाही.
कलमाअंतर्गत नियुक्त्या देता येतील. मात्र, सरकार का घाबरतंय? कायदा वैध तर कारवाई अवैध कशी? कायद्याच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयात जाण्याचा सल्ला देणे म्हणजे हा न्यायालयाचा आणि विधीमंडळाचा अवमान आहे. याबाबत आम्ही विधीमंडळात प्रश्न उपस्थित करु, असे देखील फडणवीस म्हणाले.
नियुक्त्या देणे हे सरकारच्या हातात आहे. या अगोदरही आझाद मैदानात मराठा समाजाच्या तरुणांनी आंदोलने केली. मात्र, आम्ही त्यांना जास्त वेळ बसू दिले नाही. आता सुरु असलेल्या आंदोलनाला 27 दिवस झाले. हे दुर्देवी आहे. याबाबत कायदेशीर मुद्यावर सरकारला प्रश्न विचारु. मराठा उमेदावारांना नियुक्त्या का दिल्या नाहीत? हा प्रश्न विचारु. हा पक्षाचा मुद्दा नाही. सरकार हे प्रश्न अयोग्य पद्धतीने हाताळत आहे, अशी टीका त्यांनी केली.