नवी दिल्ली – भाजपसोबत काडीमोड घेऊन बिहारमध्ये मोठा भूकंप घडवलेले नितीश कुमार आता भाजपला राष्ट्रीय राजकारणामध्ये धक्का देण्याच्या तयारीत आहेत. नितीश कुमार यांच्या याच योजनेचा भाग म्हणून त्यांच्या दिल्ली दौऱ्याकडे पहिले जात आहे. कुमार यांनी गेल्या दोन – तीन दिवसांमध्ये राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, सीताराम येच्युरी या बड्या नेत्यांची भेट घेतली आहे. नितीश कुमार यांच्या या भेटीगाठींची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरु असतानाच आज ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले आहेत. ( nitish kumar meets sharad pawar )
तत्पूर्वी, नितीश कुमार यांनी बिहारमध्ये युतीतून बाहेर पडत जेडीयू – भाजप सरकार पाडले. यानंतर त्यांनी लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत आघाडी करत पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची सूत्र हाती घेतली. भाजपसोबत सरकारमध्ये असताना नितीश कुमार यांची घुसमट होत असल्याचं पाहायला मिळत होत.
त्यातच महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेनेला भगदाड पडल्याच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये जेडीयूसोबतही असाच प्रकार सुरु असल्याची चर्चा पक्षात सुरु होती. नितीश कुमार यांनी संभाव्य धोका लक्षात घेता भाजपसोबत काडीमोड घेतल्याच राजकीय जाणकार सांगतात. भाजपसोबत काडीमोड घेण्यामागे त्यांची पंतप्रधानपदाची महत्वकांक्षा होती असेही सांगितले जात आहे.
भाजपसोबत काडीमोड घेतल्यानंतर नितीश कुमार राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय. आज शरद पवार यांच्याशी झालेल्या भेटीनंतर कुमार यांनी राष्ट्रीय पातळीवर विरोधकांची मोट बांधण्याबाबत चर्चा झाल्याचे माध्यम प्रतिनिधींना सांगितले. शरद पवार हे देखील राष्ट्रीय पातळीवर विरोधकांना एकत्र आणून भाजपला पर्याय देण्याच्या प्रयत्नात आहेत. ( nitish kumar meets sharad pawar )
केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा
देशात विरोधी पक्षाच्या नेत्यांवर केंद्रीय यंत्रणा मोदी सरकारच्या इशाऱ्यावर कारवाई करत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. नितीश कुमार हाच धागा पकडून विरोधी पक्षाच्या नेत्यांना भाजपचा विजयरथ रोखण्यासाठी एकत्र आणण्याच्या प्रयत्नात आहेत. नितीश कुमार यांना २०२४ लोकसभा निवडणुकांमधील विरोधकांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून पाहिलं जातंय. या स्पर्धेमध्ये आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल, तृणमूल काँग्रेसच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व काँग्रेस नेते राहुल गांधी हे देखील असल्याचं मानलं जातंय. असं असलं तरी नितीश कुमार यांनी, आपण ना तर पंतप्रधानपदाचा चेहरा आहोत ना आपल्याला या पदाची महत्वकांक्षा आहे असं स्पष्ट केलंय.
भाजपचे मिशन बारामती
दरम्यान, बारामती हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पारंपरिक गड मानला जातो. हा गड काबीज करण्यासाठी भाजपने जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकताच बारामती दौरा केला. यावेळी त्यांनी पवार यांचा हा गड भाजप २०२४ मध्ये खालसा करेल असा विश्वासही व्यक्त केला. बारामतीमध्ये खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेतील असं सांगत बावनकुळे यांनी आपले इरादे स्पष्ट केले.
राष्ट्रीय पातळीवर महाविकास आघाडी
२०१९ विधानसभा निवडणुकांनंतर शरद पवार यांनी महाविकास आघाडीची स्थापना करत सत्तेचा घास भाजपच्या तोंडून हिरावला होता. याहूनही महत्वाचे म्हणजे शिवसेना या हिंदुत्ववादी विचासरणीच्या पक्षाला त्यांनी सोबत घेऊन सरकार चालवले. सेनेमध्ये झालेल्या अंतर्गत बंडागळीमुळे सरकारला पायउतार व्हावे लागले आहे. मात्र २०२४ लोकसभा निवडणुकांपूर्वी महाविकास आघाडी सारखा प्रयोग राष्ट्रीय पातळीवर करून भाजपला सत्तेतून दूर ठेवण्याची चाल शरद पवार खेळत असल्याचे समजते. ( nitish kumar meets sharad pawar )