मुंबई : उद्धव ठाकरे गटातील नेत्या सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन त्या जाहीर सभा घेत आहेत. तसेच त्यांच्या सभांना नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, भंडारा जिल्ह्यात असताना सुषमा अंधारे यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. नितीन गडकरी गोपीनाथ मुंडे यांना ट्रॅपमध्ये अडकवायचे, असे सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
सभेला संबोधित करत असताना सुषमा अंधारे यांनी, “एक काळ होता जेव्हा नागपूर आणि बीड यांच्यात संघर्ष चालायचा. इकडे नितीन गडकरी आणि तिकडे गोपीनाथ मुंडे अशी स्थिती होती. नितीन गडकरी बहुजनांचे नेते गोपीनाथ मुंडे यांना जाणीवपूर्वक ट्रॅपमध्ये अडकवायचे. गोपीनाथ मुंडे यांना जाणीवपूर्वक परेशान, हैराण करायचे. त्यानंतर दुसऱ्या पिढीलाही तेच सुरू झाले. देवेंद्र फडणवीस लोकनेत्या पंकजा मुंडे यांच्या मागे लागले आहेत. पंकजा मुंडे यांना हैराण करण्यास सुरूवात करण्यात आली,” असे मोठे विधान सुषमा अंधारे यांनी केले.
“मी बीडमधील आहे, तर त्यांना वाटतं ते मला हैराण करू शकतील. मात्र ते सध्या भ्रमात आहेत. तुम्ही माझ्यामागे ईडी लावू शकत नाहीत. उभ्या महाराष्ट्रात माझ्या नावावर कुठेही एक एकर जमीन नाही. माझ्या नावावर कुठेही एक एकर जमीन असेल तर मी यानंतर महाप्रबोधन यात्रेच्या स्टेजवर दिसणार नाही. मी कष्टाची भाकरी खाते. माझी आई कोरडवाहू जमिनीत राबते. माझ्या कुटुंबियांना राजकारणाबाबत काहीही माहिती नाही,” असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.
“उद्धव ठाकरे जेव्हा पायऱ्यांवरून उतरत होते. ते बघून माझी आई रडत होती. एवढ्या चांगल्या देवमाणसाला या लोकांनी त्रास दिला, असे माझी आई म्हणत होती. तेव्हाच मी उद्धव ठाकरे यांना साथ दिली पाहिजे, असे माझ्या मनात आले. आता आपण लढायचे ठरवले आहे,” असे म्हणत सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे गटातील कार्यकत्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला.