– संभाजी गोरडे
रांजणगाव गणपती – येथील औद्योगिक वसाहतीमध्ये विविध कंपन्यांमध्ये हजारो कामगार काम करीत आहेत. यातील ठराविक कामगार हे प्रशिक्षित व कायमस्वरुपी काम करणारे आहेत. मात्र, बहुतांश कंपन्यामध्ये अनेक कामगार हे हंगामी व विना प्रशिक्षणाचे ठेकेदारी पद्धतीने काम करीत आहेत. हंगामी कामगारांना शासनाच्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे कामगारांना अपघाती मृत्यूनंतर कंपनी किंवा संबंधित ठेकेदाराकडून रोख किंवा धनादेशाच्या तुटपुंज्या रकमेवरच समाधान मानावे लागत आहे. संबंधित कामाचे योग्य प्रशिक्षण व सुविधा न मिळाल्याने कामगार जीवाला मुकत आहे. मात्र, सोन्याचा धूर काढणाऱ्या उद्योजकांना, याचे सोयरसूतक नाही.
रांजणगाव औद्योगिक वसाहतीसह अनेक ठिकाणी असे प्रकार घडत असून मयत कामगारांच्या कुटुंबीयांना तुटपुंजी मदत करुन विषय संपवला जात आहे. मात्र, कामगारांना कुठलीही इजा होऊ नये. किंवा कामगारांच्या जिविताला कुठला ही धोका होऊ नये, यासाठी कुठलीही उपाययोजना केली जात नाही. कामगारांच्या संबंधित शासनाच्या अधिकाऱ्यांचा व हगांमी कामगारांचा कधीही कसलाही संवाद होत नाही. मार्गदर्शन होत नाही. त्यातुनच कंपन्या व ठेकेदाराकडून कामगाराचे शारिरिक, आर्थिक व मानसिक शोषण केले जात आहे.
रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील फियाट कंपनीमध्ये दोन कामगारांचा मैला असलेला चेंबर साफ करताना चेंबरमध्ये पडून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. कंपन्यांच्या ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे दोन कामगारांना आपल्या जिवाला मुकावे लागले. मैला साफ करण्याचा अनुभव पाठीशी नसतानाही संबंधित ठेकेदार कामगारांकडून काम करून घेत असल्याने कामगारांना जिवाला मुकावे लागले आहे.
रांजणगाव वसाहतीमधील फियाट कंपनीमध्ये बीव्हीजी कंपनीच्या वतीने काम करणाऱ्या मच्छिंद्र दादाभाऊ काळे व सुभाष सुखदेव उघडे या दोन कामगारांना कुठलीही सुरक्षा साधने व आवश्यक प्रशिक्षण न मिळाल्याने नाहक जीव गमवावा लागला आहे. संबंधित कंपनी प्रशासन व ठेकेदार यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे या कामगारांना आपला जीव गमवावा लागला असल्याची प्रतिक्रिया मयतांच्या नातेवाईकांनी दिली.
रोजदांरीवर व पडेल ते काम करुन आपला उदरनिर्वाह करणाऱ्या अनेक गरजवंताना ठेकेदार मंडळी स्वतःच्या अर्थिक फायद्यासाठी प्रशिक्षण व सुरक्षा साधने उपलब्ध करुन न देताच त्यांच्याकडून अशा स्वरुपाची कामे करुन घेत आहेत. ही कामे करण्यास नकार दिला तर संबंधित ठेकेदार आपल्याला घरचा रस्ता दाखवेल, या भीतीने कामगार मजबुरीने ही कामे करत असतात. बी. व्ही. जी. कंपनीच्या प्रशासनाने, संबंधित सुपरवायझरने जर कामगारांना संबंधित काम करताना सुरक्षा साधने उपलब्ध करुन दिली असती तर तर आज दोन कामगारांच्या कुटुंबाची परवड झाली नसती, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.
नाथाभाऊ शेवाळे यांच्याकडून पाठपुरावा
बी. व्ही. जी. कंपनी दोन कामगारांच्या मृत्यूस जबाबदार आहे. कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री, गृहमंत्री, राज्यपाल व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. पोलीस महासंचालक, अप्पर मुख्य सचिव, औद्योगिक सहसंचालक, औद्योगिक सुरक्षा संचालक, कामागार आयुक्त आदींशी प्रत्यक्ष भेटून संबंधित कंपनीच्या ठेकेदारावर सदोषमनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. त्यामुळे शेवाळे यांनी हे प्रकरण चांगलेच धसास लावले आहे.