नवी दिल्ली – कृषी कायद्यांचा शेतकऱ्यांना फायदाच होणार आहे. त्यामुळे शेतीक्षेत्रात माघार घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सप्टेंबर महिन्यात लागू केलेल्या कायद्यांमुळे दलालांचे उच्चाटन झाले आहे. शेतकऱ्यांना कोठेही माल विकण्याची मुभा मिळाली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री राजनाथसिंह यांनी सोमवारी केले.
हे कायदे मागे घेण्यासाठी शेतकरी गेले 18 दिवस कडाक्याच्या थंडीत दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. राजनाथ यांनी ही ठाम भूमिका मांडल्यानंतर आंदोलनाची व्याप्ती वाढण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.
साथीच्या काळात प्रतिकूल परिणाम जराही न झालेले कृषी हे एकमेव क्षेत्र आहे. एवढेच नव्हे तर ते सर्वोत्तमही आहे. आपले उत्पादन उच्चांकी झाले आहे गोदामे भरलेली आहेत. सरकारला नेहमीच शेतकऱ्यांचे ऐकायचे आहे.
त्यांचा गैरसमज दूर करून त्यांना हवा असणारा विश्वास देण्याचा आमचा प्रयत्न आहे. चर्चा आणि संवादासाठी आमचे सरकार तयार आहे, असे ते म्हणाले. एफआयसीसीआयच्या वार्षिक समारंभात ते बोलत होते.