जयपुर – देशातील 99 टक्के शेतकरी मोदींबरोबर आहेत असा दावा भाजपचे सरचिटणीस अरूण सिंह यांनी केला आहे. आज येथे बोलताना ते म्हणाले की, कॉंग्रेसने शेतकऱ्यांना भडकावले आहे आणि तोच पक्ष शेतकरी आंदोलनाला इंधन पुरवत आहे असा आरोपही त्यांनी केला.
तथापि राजस्थानातील भाजपचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षानेही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे त्या विषयी विचारले असता सिंह म्हणाले की, त्या पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करून त्यांचे मन वळवण्याचा आम्ही प्रयत्न करू. राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे प्रमुख खासदार हनुमान बेनीवाल यांनी मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहींत तर सरकारचा पाठिंबाहीं काढून घेण्याचा इशारा दिला आहे.
सिंह म्हणाले की, 99 टक्के शेतकरी मोदींच्या मागे असून उर्वरीत एक टक्का शेतकऱ्यांच्या मनात काहीसे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या मनातील गोंधळ काढून टाकण्याची सरकारची तयारी आहे.
आंदोलनाला बसलेले शेतकरी निष्पाप आहेत पण त्यांच्यात काहीं समाजकंटक घुसले आहेत असा आरोपही त्यांनी केला. त्यांनी तेथे सीएए विरोधात आंदोलन करणाऱ्या शारजील इमाम यांचाही फोटो लावला होता असा आरोपही त्यांनी केला.