परळी – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचा उल्लेख “फडतूस गृहमंत्री’ असा केल्यामुळे शिवसेना (ठाकरे गट) आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीदेखील उडी घेत थेट उपमुख्यमंत्री फडणवीसांबद्दल वक्तव्य केले आहे. विरोधकांनी माझा उल्लेख थेट दारूवालीबाई असा केला होता, त्यामुळे आता ठाकरेंच्या टीकेमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यथित होणार नाहीत, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
परळी शहरात भाजपकडून सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली होती. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केले. परळीत माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, राजकारण हा काटेरी रस्ता आहे. राजकारणातील सिंहासनदेखील काटेरी असते.
सत्तेत असताना विरोधकांकडून आपल्यावर नेहमीच टीका होत असते. अनेकदा खालच्या पातळीवरही टीका केली जाते. मी मंत्री असताना मला दारूवालीबाई म्हटले गेले होते. त्यामुळे आता टीकेमुळे फडणवीस देखील व्यथित होणार नाहीत. मुंडे आणि फडणवीस यांच्यात सध्या काही आलबेल असल्याचे दिसत नाही. त्यामुळे पंकजांच्या वक्तव्यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
राजकारणात काटेही वाट्याला येतात –
मी सत्तेत असताना माझ्यावर अनेकदा खालच्या पातळीवर टीका करण्यात आली होती. दारूवाली बाई आणि घोटाळ्यांच्या आरोपांवरून मला लक्ष्य करण्यात आलं. ट्रोलिंग करत रेल्वेस्टेशनवर माझे फोटो लावण्यात आले होते. माझा फोटो लावून काही लोकांनी पाकिटे वाटली. त्यावेळी माझा अपमान करण्यात आला, त्यामुळे राजकारणात केवळ फुलंच नाही तर काटेही वाट्याला येतील. त्याचमुळे उद्धव ठाकरेंच्या टीकेमुळे देवेंद्र फडणवीस व्यथित होतील, असे वाटत नाही, असेही पंकजांनी यावेळी म्हटले.