नवी दिल्ली – प्रदीर्घ काळ कॉंग्रेसमध्ये राहुन राजकारण करणारे व आता त्या पक्षातून बाहेर पडलेले ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी गेल्या दोन दिवसांपासून अचानक सक्रियता दर्शवली आहे. परवा राहुल गांधी यांचे नाव न घेतला त्यांनी कॉंग्रेसवर टीका केली होती. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत. आझाद यांच्या सक्रियतेमुळे त्यांना भारतीय जनता पार्टीला काही संदेश द्यायचा आहे का हा प्रश्न तर आहेच तथापि, जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकांची लकरच घोषणा केली जातेय का अशीही अटकळ बांधली जाते आहे.
भाजपच्या मोदी सरकारने गेल्या काही महिन्यांत विरोधी पक्षांतील नेत्यांवर जोरदार कारवाई सुरू केली आहे. ईडी या केंद्रीय संस्थेने बहुतेक प्रमुख नेत्यांना जेरीस आणले आहे. त्यामुळे विरोधकही मतभेद विसरून सरकारच्या विरोधात एकवटताना दिसत आहेत. सरकार सूडाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला जातो आहे. मात्र आझाद यांनी हा दावा फेटाळला आहे.
आझाद म्हणाले की त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या समवेत काम केले आहे आणि त्याचे श्रेय मोदींनाच दिले पाहिजे. विरोधी पक्षाचा नेता म्हणून मी त्यांना (मोदींना) कोणत्याच मुद्द्यावर सोडले नाही. मग तो कलम 370 चा विषय असेल किंवा सीएएचा विषय असेल अथवा हिजाब असेल. मात्र मोदी हे उदार नेते आहेत. मी त्यांच्या सरकारची अनेक विधेयके अयशस्वी ठरवली. पण ते एका राजकीय नेत्याप्रमाणेच वागले. त्यांनी त्याचा बदला घेतला नाही व त्याचे श्रेय त्यांना दिलेच पाहिजे.
आझाद यांनी दोन दिवसांपूर्वीही कॉंग्रेसच्या संदर्भात भाष्य केले होते. त्यात त्यांनी त्यांच्या आझाद या पुस्तकात नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या संदर्भातील मते मांडली आहेत त्याचीच माहिती दिली होती. राहुल यांचे नाव न घेता राहुल यांच्या उणीवांवरही बोट ठेवले. आता ते मोदींचे स्पष्ट कौतुक करत असल्यामुळे त्याचा राजकीय वर्तुळात वेगळा अर्थ काढत तर्क लढवले जात आहेत.