मुंबई – शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी राज्यातील राजकीय वातावरण पेटले असताना, शिंदे गटाच्या ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी आनंद दिघे मृत्यू प्रकरणात उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहे. आनंद दिघे यांच्यावर उपचार सुरू असताना उद्धव ठाकरे त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात आले आणि त्यानंतर 30 मिनिटांतच त्यांचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक दावा मिनाक्षी शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे आता यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे आनंद दिघे यांना रुग्णालयात भेटण्यासाठी आले होते, ठाकरे आणि दिघे रुग्णालयात असताना आत नेमके काय झाले?, हे कुणालाच समजले नाही. परंतु उद्धव गेल्यानंतर 30 मिनिटांच्या आतच आनंद दिघे यांना मृत घोषित करण्यात आल्याचा आरोप मिनाक्षी यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. त्यामुळे आता यावरून ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे. आनंद दिघे यांच्या मृत्यू प्रकरणाबाबत ठाणेकरांच्या मनात आजपर्यंत संभ्रमाचे वातावरण असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.
रोशनी शिंदेंची नाटके सुरू
ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना डॉक्टरांनी क्लिनचीट दिली आहे, तरीदेखील त्यांना वारंवार रुग्णालयात दाखल केले जात आहे. रोशनी शिंदेची प्रकृती ठिक असतानाही तिला गंभीर दुखापत झाल्याचे ठाकरे गटाकडून दाखवण्यात येत आहे. रोशनी गर्भवती नाहीये आणि आता तर तिला बोलताही येत नसल्याचे ठाकरे गटाचे नेते सांगत आहे, त्यामुळे हा प्रकार का आणि कशासाठी केला जात आहे? हे सर्वांनाच कळले असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.