आयपीएल रद्द झाली तर वाईट तर वाटेलच पण करोनाचा वाढता धोका लक्षात घेता इथे स्पर्धेपेक्षा आपला जीव कसा वाचेल याची चिंता लागली आहे. जगलो तरच स्पर्धेत खेळता येइल ना, असा उपरोधीक टोला भारताचा नवोदीत क्रिकेटपटू नवदीप सैनी याने आयपीएलचा अट्टहास करणाऱ्यांना लगावला आहे.
करोनाच्या धोक्यामुळे 29 मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आलेली आहे. मात्र, सद्य परिस्थिती पाहता ही स्पर्धा आता आणखी 2 महिने तरी होऊ शकत नाही हे स्पष्ट दिसत आहे. अशा स्थितीत आगामी आशिया करंडक स्पर्धा रद्द करुन त्या वेळेत आयपीएल खेळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वकरंडक देखील पुढे ढकलण्यात येणार असे संकेत मिळाल्याने ऑगस्ट महिन्याचे अखेरचे 10 दिवस तसेच सप्टेंबर व ऑक्टोबर या कालावधीत ही स्पर्धा खेळविण्यात येऊ शकते असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने संकेत दिले होते. ही स्पर्धा रद्द झाली तर सगळ्याच खेळाडूंची नाराजी होईल. पण यावेळी स्पर्धेपेक्षाही जास्त महत्वाचा लोकांचा जीव आहे आणि कोणतीही स्पर्धा त्यापेक्षा महत्वाची नाही, असे सैनीने व्यक्त केले.