संकटकाळातही गोरखधंदे : पुरवठा निरीक्षकांना तपासणी करून कारवाई करण्याचे निर्देश
पिंपरी – शहरातील काही स्वस्त धान्य दुकानातून जादा दराने नागरिकांना धान्य विकले जात असल्याची तक्रार काही दिवसांपासून नागरिक करत आहेत. “करोना’मुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीतही नागरिकांची लूट चालू आहे. याबाबत जागृत नागरिक महासंघाच्या वतीने परिमंडल अधिकारी (निगडी) दिनेश तावरे यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. तावरे यांनी संबंधित तक्रारीला अनुसरून पुरवठा निरीक्षकांना याबाबत तपासणी करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
शिधापत्रिकेवर सध्या अंत्योदय अन्न योजना आणि राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना कार्डधारकांना एप्रिल महिन्यासाठी नियमित धान्य वाटप केले जात आहे. त्यामध्ये 2 रुपये किलो गहू आणि 3 रुपये किलो दराने तांदूळ विकले जात आहे. दरम्यान, काही स्वस्त धान्य दुकानदार हे जोडधंदा म्हणून किराणा दुकानही चालवतात. त्यांच्याकडून रेशनवरील धान्याशिवाय किराणा साहित्य खरेदी करणाऱ्यांना मालाची पावती न देणे, जादा रक्कम वसूल करण्याचे प्रकार होत आहेत.
जागृत नागरिक महासंघाचे अध्यक्ष नितीन यादव यांनी याबाबत एक तक्रार परिमंडल अधिकाऱ्यांकडे केली आहे. या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, वाकड येथील स्वस्त धान्य दुकानदाराने शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त रक्कम एका कार्डधारकाकडून वसूल केली. त्याबाबत पावती मागितली असता पावती देण्यास नकार दिला. त्याशिवाय, तक्रार वही मागितली असता ती देखील दिली नाही. दुकानातील अन्नधान्याची किंमत दर्शविणारा फलक देखील दुकानात दर्शनी भागात लावण्यात आलेला नव्हता. तरी, संबंधित दुकानदारावर तत्काळ कठोर कारवाई करावी.
मोफत धान्य लवकरच
शासनाने घोषणा केलेल्या मोफत धान्याचे स्वस्त धान्य दुकानांमध्ये लवकरच वाटप सुरू होणार आहे. एप्रिल ते जून या कालावधीसाठी प्रति व्यक्ती पाच किलो मोफत तांदूळ मिळणार आहे. अंत्योदय आणि अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा दिले जाणारे धान्य घेतल्यानंतरच हे धान्य मिळणार आहे. सध्या शहरातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये मोफत धान्याचा पुरवठा करण्याचे काम सुरू आहे. हे पुरवठ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर लगेचच मोफत धान्य वाटपाला सुरवात होणार आहे.
वाकड येथील ज्या स्वस्त धान्य दुकानदाराबाबत तक्रार आलेली आहे, त्याबाबत तपासणी करण्याचे आदेश पुरवठा निरीक्षकांना दिले आहेत. तसेच, तपासणीनंतर पुढील कारवाई करण्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत.
– दिनेश तावरे, परिमंडळ अधिकारी, निगडी.