नवी दिल्ली – माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला भारतीय क्रिकेट संघात पुनरागमन करायचे आहे. मात्र, गेले आठ महिने तो कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळलेला नाही मग अशा स्थितीत त्याची निवड कशी करणार असा सवाल माजी कसोटीपटू व खासदार गौतम गंभीरने केला आहे.
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि निवड समितीने धोनीला आयपीएल खेळ व त्यात तंदुरुस्ती तसेच कामगिरी सिद्ध केलीस तरच संघ निवडीसाठी तुझ्या नावाचा विचार केला जाईल असे सांगितले आहे. सध्या देशात करोनाचा हाहाकार सुरु आहे. त्यामुळे अनेक स्पर्धा पुढे ढकलाव्या लागल्या असून काही स्पर्धा तर रद्दही केल्या गेल्या आहेत. मग अशा स्थितीत धोनीच्या निवडीला कोणते निकष लावले जाणार याचे उत्तर शास्त्री आणि निवड समिती देऊ शकेल का?
धोनीने चेन्नई सुपरकिंग संघाच्या सराव सत्रात उपस्थिती लावली होती, मात्र करोनाच्या वाढत्या धोक्यामुळे हे सराव सत्र बंद झाले आहे. मग त्याला सरावही करता येणार नाही. त्याला संघात पुनरागमन करायचे असेल तर त्यापूर्वी त्याला स्वतःची कामगिरी सिद्ध करावी लागणार आहे. सध्याचे वातावरण पाहता पुढील किमान 3 महिने तरी स्पर्धा होऊ शकणार नाहीत असे दिसते मग त्याच्या निवडीची संधी कशी दिली जाणार आहे, असेही गंभीरने विचारले आहे.