नवी दिल्ली – शेतकऱ्यांनी दिल्लीतील आंदोलन आधिक तीव्र करण्याचा इशारा दिल्यानंतर दिल्ली पोलिसांनी शहरातील सुरक्षा व्यवस्था आणखी वाढवली आहे. शेतकऱ्यांनी आता जयपुर दिल्ली आणि दिल्ली-आग्रा हे महामार्गही बंद करण्याचा इशारा दिला आहे. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत आता आणखीच वाढ होत असून पंजाब आणि अमृतसरहून हजारो शेतकरी दिल्लीकडे कुच करून तिकडे पोहचले आहेत.
शेतकरी दिल्लीत घुसू नयेत म्हणून दिल्लीच्या एन्ट्री पॉईन्ट वर अनेक पदरी सुरक्षा ठेवण्यात आली असून अनेक ठिकाणी बॅरिकेट्स लाऊन रस्ते बंद करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा सामान्य माणसांना त्रास होऊ नये म्हणून बंद असलेले रस्ते आणि पर्यायी रस्ते याविषयी नागरीकांना ट्विटरवरून माहिती दिली जात आहे.
सिंघु, औचंडी, पायू मनियारी, आणि मंगेश या सीमांवरचे रस्ते बंद करण्यात आले आहेत. सध्या दिल्ली बाहेरून दिल्लीकडे येणाऱ्या लोकांसाठी लामपुर, सफीयाबाद, साबोली, आणि सिंघू स्कुल टोल टॅक्स बॉर्डरचे रस्ते खुले आहेत त्याचा नागरीकांनी वापर करावा असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
आऊटर रिंग रोड वरून जाणे नागरीकांनी टाळावे अशी सुचनाहीं पोलिसांनी केली आहे. नॉयडा आणि गाझीयाबाद कडील चिल्ला आणि गाझीपुर येथील मार्गही आता बंद करण्यात आले आहेत. झारखंड बॉर्डर केवळ दुचाकी वाहनांसाठी खुली राहील असेही पोलिसांनी सांगितले. हरियानाकडे जाणाऱ्यांनी झरोडा मार्गाचा वापर करावा असे नागरीकांना सुचवण्यात आले आहे.