चंदीगड – कृषी विधेयकांच्या विरोधातील आंदोलनाची तीव्रता हरियानातील शेतकऱ्यांनी वाढवली असून त्यांनी त्या राज्यांतील काही टोलनाक्यांचा ताबा घेतला आहे. अंबाला-हिस्सार रोडवरील टोल नाका भारतीय किसान युनियनच्या शेतकऱ्यांनी ताब्यात घेतला आहे.
या संघटनेचे नेते मालकित सिंह आणि मनिष चौधरी यांनी तेथे जाऊन हा टोल नाका बंद पाडला. कोणताहीं टोल वसुल न करता तेथून वाहने मोफत सोडली जात आहेत. टोल वसुलीला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. कर्नाल जिल्ह्यातील बस्तरा आणि पिओंट टोल नाकेही शेतकऱ्यांनी ताब्यात घेतले असून तेथेही टोल वसुलीला मनाई करण्यात आली आहे.
पंजाबातील टोल नाकेही शेतकऱ्यांनी बंद पाडले आहेत. गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून पंजाबातील 25 टोल नाके शेतकऱ्यांनी बंद पाडले असल्याने त्या ठिकाणची आत्तापर्यंत तीन कोटी रूपयांची टोल वसुली बुडाली आहे अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली. आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहींत तर दिल्लीकडे जाणारे रेल्वे मार्गही बंद पाडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.