लखनौ – गुजरातच्या सूरत लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवाराची बिनविरोध निवड झाली. त्या घडामोडीवर समाजवादी पक्षाचे (सप) अध्यक्ष अखिलेश यादव यांनी तीव्र आक्षेप घेतला. त्या मतदारसंघात नव्याने निवडणूक प्रक्रिया घेण्याची मागणी त्यांनी केली.
सूरतमधील कॉंग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद ठरला.
तर, इतर ८ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली. त्या घटनाक्रमावर अखिलेश यांनी सोशल मीडियावरून प्रतिक्रिया दिली. सूरतमध्ये जनतेचा अपमान झाला. त्या मतदारसंघात मतदानच होऊ दिले गेले नाही.
भाजप मतदानाचा हक्कच हिरावून घेईल असे आम्ही आधीपासूनच म्हणत आहोत. तेच घडले आहे. अशाप्रकारे गडबड करून विजयी होणारे जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी नाहीत. त्यामुळे संबंधित घटनेत राज्यघटनेची हत्या झाली आहे. भाजप निवडणूक आयोगाला ठेंगा दाखवत आहे. मानहानीबद्दल आयोगाने कारवाई करायला हवी.
चंदिगढ महापौर निवडणुकीप्रमाणे सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाने सूरतमधील घटनेची स्वत:हून दखल घ्यावी. तेथील निवडणूक रद्द करावी. तसेच, नव्याने निवडणूक प्रक्रिया राबवावी, असे आवाहन त्यांनी केले.
सूरतमधील उमेदवाराच्या बिनविरोध निवडीमुळे भाजपने निकालाआधीच खाते उघडले. मात्र, त्या बिनविरोध निवडीवरून भाजपची कोंडी करण्यासाठी विरोधक पुढे सरसावल्याचे दिसून येत आहे.