नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानातील प्रचारसभेत जे भाषण केले होते त्याच्या संदर्भात त्यांच्या विरोधात दाखल झालेल्या तक्रारींवर कारवाई करण्याच्या मागणीच्या पाश्र्वभूमीवर निवडणूक आयोगाने आता या तक्रारींची पडताळणी सुरू केली आहे.
कॉंग्रेसची सत्ता आली तर ते लोकांची संपत्ती मुस्लिमांमध्ये वाटण्याचे काम सुरू करतील असा आरोप मोदी यांनी केला होता.
त्यांनी रविवारी केलेल्या या भाषणाच्या विरोधात कॉंग्रेस पक्ष आणि कम्युनिस्ट पक्षाने निवडणूक आयोगाकडे स्वतंत्र तक्रारी केल्या होत्या. देशातील साधन संपत्तीवर अल्पंसख्यकांचा पहिला अधिकार आहे या तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या त्यावेळेच्या विधानाचा मोदी यांनी आपल्या भाषणात संदर्भ दिला होता.
आता पंतप्रधानांच्या विरोधात तक्रारी आल्यानंतर निवडणूक आयोगाने पडताळणी सुरू केली आहे. आयोगाने मोदी आणि भारतीय जनता पार्टी यांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचूरी यांनी केली आहे. धार्मिक भावना भडकावण्याच्या आणि द्वेष पसरवण्याच्या प्रयत्नांबद्दल एफआयआर दाखल करण्यात यावी अशी मागणीही येचूरी यांनी केली.
कॉंग्रेसचे नेते अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की आता ही निवडणूक आयोगाचीही परिक्षा आहे. आयोग आपल्या निष्क्रियेतेचे एक उदाहरण सादर करत आपल्या घटनात्मक कर्तव्यांचा त्याग करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.