रघुनाथ थोरात
“क’ दर्जा; शासनाचे वेळकाढू धोरण
चाफळ – विभागातील सडादाढोली येथील सुमारे 365 वर्षांचा इतिहास लाभलेले व तीर्थक्षेत्र पर्यटनस्थळाचा “क’ वर्गाचा दर्जा मिळालेले रामघळ -कुबडीतीर्थ विकासासाठी निधीची आवश्यकता आहे. पण शासनाच्या वेळकाढू उदासीन धोरणामुळे आजपर्यंत उपलब्ध होऊ शकला नाही, ही या पर्यटन स्थळांची खरी शोकांतिका आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील उंब्रजपासून पश्चिमेस बारा किमी अंतरावर चाफळ हे गाव आहे. याच चाफळपासून सुमारे बारा किमी अंतरावर उंच महाकाय डोंगर कपारीमध्ये समर्थ रामदास स्वामींनी एका गुहेची निर्मिती केली. या गुहेलाच रामघळ या नावाने ओळखले जाते. तेथून जवळच 100 मीटर अंतरावर छत्रपती शिवाजी महाराजांना तहान लागली असता समर्थांनी आपल्या हातातील कुबडीने दगड बाजूला करून एक पाण्याचा झरा निर्माण केला. त्यास कुबडीतीर्थ या नावाने ओळखले जाते.
या झऱ्यास बारमाही पाणी असते. याच पाण्याचा उपयोग येथील सडादाढोली गावचे ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यासाठी करतात. या घळीमध्ये समर्थांनी अनेक वर्षे वास्तव्य केले आहे. घळीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे घळीच्या कड्यावरून चाफळ येथील श्रीराम मंदिराचे दर्शन होते. म्हणूनच “दास डोंगरी राहतो, यात्रा रामाची पाहतो’ असे म्हटले जाते. समर्थ रामदासांच्या वास्तव्याने पावन झालेले ठिकाण म्हणून सडादाढोली येथील रामघळ -कुबडीतीर्थ हे ठिकाण महाराष्ट्रात ओळखले जाते. या तीर्थक्षेत्री भेट देण्यासाठी प्रतिवर्षी लाखो भाविक येत असतात.
सध्या या ठिकाणी अनेक प्रकारच्या समस्यांना पर्यटकांना तोंड द्यावे लागत आहे. पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र सोय नाही. तसेच इकडे येणाऱ्या रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. रस्ता जागोजागी उखडला आहे. या परिसराचा विकास करण्यासाठी माजी बांधकाममंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी या ठिकाणास तीर्थक्षेत्र पर्यटनस्थळाचा “क’ वर्ग दर्जा मिळवून दिला आहे. परंतु चांगल्या स्वरूपाचा रस्ता व इतर सुविधांचा अभाव येथे जाणवत आहे. येथील पर्यटनस्थळांच्या सुधारणेच्या दृष्टीने भरीव निधीची तरतूद अत्यंत आवश्यक आहे.
सातारा-तारळे-पाटण मार्गे महाबळवाडीतूनही याठिकाणी जाता येते. या ठिकाणीही येणाऱ्या पर्यटक, भाविकांच्या प्रसादासह इतर सोयींची व्यवस्था रामघळ -कुबडीतीर्थ ट्रस्टच्या माध्यमातून केली जात आहे. तर येथील ग्रामपंचायत सडावाघापूर अंतर्गत हे गाव व ठिकाणचा समावेश होतो.
आज या घळीमध्ये समर्थांसह वसंतगड येथील संत जनार्दन महाराज यांचे प्रतिकात्मक पुतळे बसवण्यात आले आहेत. याठिकाणी पर्यटनवाढीच्या दृष्टीने प्रशासनाचे वेळकाढू तसेच उदासीन धोरण जबाबदार असल्याने पर्यटक पाठ फिरवू लागले असल्याचे या विभागातील जनेतचे म्हणणे आहे.
रामघळ-कुबडीतीर्थ या ठिकाणाला “क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाला आहे. येथील विकासाला शासनाकडून निधी मिळाला नसल्याने अनेक सोयी-सुविधांचा येथे अभाव आहे. शासनाने तसेच पर्यटकांनी या ठिकाणच्या विकासासाठी निधी दिल्यास येथे कायापालट होईल.
नथुराम झोरे, माजी सरपंच