पाचगणी – भिलार, ता. महाबळेश्वर येथील केम्ब्रिज हायस्कूलमधील काही आदिवासी विद्यार्थी शाळेत शिक्षकांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आज पळून जात असताना भोसे गावाच्या डोंगरात युवकांनी त्यांना पकडून पाचगणी पोलीस ठाण्यात नेले. तेथे त्या चिमुरड्यांनी त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचला. ते ऐकताना उपस्थितांची मने हेलावली. या घटनेमुळे भिलार परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी, भिलार येथील केम्ब्रिज हायस्कूल या निवासी शाळेत शासनाच्या आदिवासी विभागाची 292 मुले शिक्षण घेत आहेत. त्यातील काही मुले आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भोसे खिंडीतून पळत निघाली होती. त्यावेळी गावातील अजित गोळे व कुलदीप गोळे हे घरासमोर कट्ट्यावर बसले होते. त्यावेळी घोळक्याने आलेली मुले पाहून अजित व कुलदीप यांना शंका आली. त्यांनी मुलांना थांबवले; परंतु ती भीतीने डोंगराच्या दिशेने पळू लागली. त्यावेळी गावातील तुषार गोळे, लखन गोळे व नेहा गोळे, अनुजा गोळे या युवतीही अजित व कुलदीप यांच्या मदतीला आल्या. त्यांनी मुलांना पकडून विचारपूस केली असता, ती ढसाढसा रडू लागली. आम्ही केम्ब्रिजचे विद्यार्थी असल्याचे त्यांनी सांगितले.
भोसेतील युवकांनी त्यांना शाळेत पोहोचवण्याचा निर्णय घेतल्यावर ती आणखी भेदरली. आम्हाला शाळेत न सोडता पोलीस ठाण्यात नाही तर सरकारी अधिकाऱ्यांकडे न्या, अशी विनवणी मुलांनी केली. त्यानंतर या युवकांनी मुलांना भोसे खिंडीत आणले. तेथे आणखी दोन मुले बसमधून निघाल्याचे समजल्यावर युवकांनी बस थांबवून त्या मुलांनाही खाली उतरवले. एकूण 13 मुलांना घेऊन भोसेच्या युवकांनी पाचगणी पोलीस ठाणे गाठले.
ही सर्व मुले आठ ते दहा वर्षे वयोगटातील असल्याने खळबळ उडाली. पोलीस ठाण्यात आणल्यावर भेदरलेल्या मुलांनी रडायला सुरुवात केली. रडत रडतच त्यांनी केम्ब्रिज शाळेतील शिक्षकांकडून होत असलेल्या अत्याचारांचा पाढा वाचला. आम्हाला शाळेत नियमित मारहाण होत असल्याने पळून जात असल्याचे त्यांनी सांगितले. वरच्या वर्गातील मुले आम्हाला मारहाण करतात, आमची डोकी भिंतीवर आपटतात. आम्हाला व्यवस्थित जेवण मिळत नाही. तक्रार केल्यास शिक्षक बांबूने मारहाण करतात, असे गाऱ्हाणे या मुलांनी मांडले.
तुम्ही आम्हाला पुन्हा शाळेत सोडले तर शिक्षक पुन्हा मारतील. त्यापेक्षा आम्हाला सरकारच्या ताब्यात द्या. आम्हाला घरी पाठवा, असे आर्जव मुलांनी केले. दरम्यान, या मुलांचे जबाब नोंदवून घेऊन सातारा येथे बालसंरक्षण अधिकारी कार्यालयात अहवाल पाठवणार असल्याचे पाचगणी पोलीस ठाण्याचे सपोनि विकास बडवे यांनी सांगितले. ही चिमुकली मुले शाळेतून अचानक गायब होतात आणि शाळेच्या प्रशासनाला त्याची गंधवार्ताही नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
शासनाच्या हेतूला हरताळ
आदिवासी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकता यावे, त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणावे यासाठी शासनाच्या आदिवासी विभागाने या मुलाना पाचगणीतील शाळांमध्ये प्रवेश दिला आहे. मात्र, या मुलांवर अत्याचार होत असतील तर शासनाच्या मूळ हेतूला हरताळ फासण्याचे काम शाळा प्रशासनाकडून होत आहे. शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधांवर लक्ष ठेवणारी यंत्रणाच कुचकामी ठरत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.