मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये केलेल्या भाषणावरून राज्यातील भाजप नेत्यांनी त्यांना चांगलाच टार्गेट केलं आहे. अशातच आता महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने ‘मुख्यमंत्र्यांनी भाजपला आरसा दाखवला’ असं म्हणत ठाकरे यांची पाठराखण केली आहे.
याबाबत बोलताना राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी, भाजप धर्मावर आधारित राजकारण करून लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप लगावला.
राज्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत स्थापन केलेली महाविकास आघाडी किमान समान कार्यक्रमात ठरवण्यात आलेल्या ध्येय-धोरणांच्या पूर्तीसाठी काम करत असल्याचंही नवाब यावेळी बोलताना म्हणाले.
आघाडीमध्ये असताना देखील तिन्ही पक्षांनी आपापली विचारधारा कायम ठेवली असल्याचं नवाब यांनी सांगितलं.
“मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये राज्यपाल व भाजप नेते कशाप्रकारे जनतेची दिशाभूल करत आहेत याचा आरसा त्यांना दाखवला.” असं नवाब म्हणाले.
तत्पूर्वी, दसरा मेळाव्याच्या भाषणामध्ये बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजप नेत्यांवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी आपलं सरकार पडून दाखवाच असं आव्हानही विरोधकांना दिलं. मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये टार्गेट करण्यात आलेल्यांमध्ये राज्यपाल कोश्यारी यांचाही समावेश होता.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणानंतर भाजप नेत्यांकडून त्यांनी वापरलेल्या भाषेबाबत आक्षेप व्यक्त करण्यात आला आहे. तसेच काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत गेल्याने शिवसेनेचे हिंदुत्व दूषित झाल्याची टीकाही केली आहे.