मुंबई : राज्यात मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आता नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. नाशिकमधील 3 मे पर्यंत मशीदच नव्हे तर सर्वच धार्मिक स्थळांवरच्या भोंग्यांना परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यानंतर पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या या आदेशाची आताराज्यभरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. नाशिकमध्ये जातीय तेढ निर्माण न करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिलेल्या आदेशानुसार, मशिदीच्या 100 मीटर परिसरात हनुमान चालीसा म्हणण्यास परवानगी नाही. त्याशिवाय, कोणाला हनुमान चालीसा लावायची असल्यास देखील पोलीस आयुक्तांची परवानगी आवश्यक असल्याचे या आदेशात म्हटले गेले आहे.
नाशिकमध्ये सर्वच प्रार्थनास्थळावरील भोंग्यांना पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार आहे. 3 मे पर्यंत मशीदच नव्हे तर सर्वच धार्मिक स्थळांवरच्या भोंग्यांची परवानगी घ्यावी लागणार. त्यानंतर जर 3 मे नंतर प्रार्थनास्थळावर विनापरवानगी भोंगे असतील तर त्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
नाशिक पोलीस आयुक्तालयाने काढलेल्या आदेशानुसार, ध्वनीक्षेपकाबाबत सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशाचे पालन करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश आणि त्याअनुषंगाने राज्य सरकारचे आदेश यानुसार, आवाजाची पातळी ठरवण्यात आली आहे. या आवाजाची पातळी औद्योगिक, निवासी, व्यावसायिक, शांतता क्षेत्रासाठी निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार भोंगे असलेल्या प्रार्थनास्थळांना आवाजाची पातळी ठरवावी लागणार आहे.