अमोल राजपूत
वालचंदनगर -गेल्या काही दिवसांत गॅससह जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढल्याने गृहिणींचे आर्थिक गणित कोलमडले आहे. ग्रामीण भागात पुन्हा एकदा घराघरात चुली पेटल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. पेट्रोल, डीझेल, खाद्यतेल यांचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने व उन्हाळ्यात विजेचे बिलही वाढल्याने सर्वसामान्य कुटुंबासह नोकरी करणाऱ्या कुटुंबाचे आर्थिक गणित बिघडले आहे.
गेल्या काही दिवसात घरगुती गॅस व जीवनावश्यक वस्तूंमध्ये लागणारे तेल, साखर, डाळी, भाजीपाला, यांसह अनेक वस्तूचे दर वाढलेत. घर खर्च करण्यासाठी असलेले पैसे महिला काटकसरीने वापरत आहेत. ग्रामीण भागात अनेक जण मोलमजुरी, शेती काम करून घर चालवतात तर शहरी भागात अनेक सर्वसामान्य कुटुंबे हे मासिक पगारावर आपले घर चालवतात.
यामध्ये महिन्याच्या पगारात दूध, किराणा, भाजीपाला, गॅस, विजेचे बिल, मेडिसिन, यांसह विविध वस्तू खरेदी करण्याचे व त्यातून कुटुंब चालवण्याचे काम महिला करत असतात; मात्र गेल्या काही दिवसांपासून जीवनावश्यक वस्तूंचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने महिलांना घर कसे चालवावे, असा प्रश्न पडला आहे.
यामध्ये अनेक महिला हाताला मिळेल ते काम करून संसाराला हातभार लावत आहेत. ग्रामीण भागातील मळ्यात व वाडी वस्तीत राहणाऱ्या सर्व सामान्य कुटुंबातील घरात पुन्हा एकदा चुली पेटल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
ग्रामीण भागात आजही अनेक ठिकाणी एकत्र कुटुंब पद्धत आहे. गॅसच्या किमती वाढल्या असल्याने एवढ्या कुटूंबाचे जेवण गॅसवर बनवणे परवडत नाही. त्यामुळे एक वेळचा स्वयंपाक हा चुलीवर बनवला जात आहे.
-यशोदा अमोल राजपूत, गृहिणी
घरगुती वापरात लागणाऱ्या किराणा माल, गॅस, व भाजीपाला यांच्या किमती वाढल्याने घरात पैसे खर्च करताना खूप काटकसर करावी लागत आहे. महागाई वाढल्याने कुटुंबातील लहान मुले यांसह अनेकांच्या आवडी निवडी जपता येत नाहीत. त्यामुळे वाढलेली महागाई लवकर आटोक्यात येईल अशी आशा आहे.
-मेधा प्राण चंदनशिवे, गृहिणी