नाशिक :- जिल्ह्यातील नार – पार प्रकल्प, गोदावरी नदी प्रदूषण मुक्त करणे, जिल्हा झोपडपट्टी मुक्त करणे, मुंबई – नाशिक समृध्दी मार्गाचे काम, ओझर विमानतळाचे काम, नाशिक – पुणे हाय स्पीड रेल्वे अशा विविध जिल्हा विकासाच्या पायाभूत प्रकल्पांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल.
त्याच प्रमाणे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेस अडचणीतून बाहेर काढण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
नाशिक येथील ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, विधान परिषदेच्या उप सभापती डॉ. निलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास, पंचायत राज आणि पर्यटनमंत्री गिरीष महाजन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्राचा विकास हे शासनाचे प्राधान्य आहे. राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही. मिनी महाराष्ट्र म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख आहे. तसेच शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात येत आहे.
वातावरण बदलामुळे निर्माण होणाऱ्या कोणत्याही नैसर्गिक संकटात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री पवार यांनी नागरिकांना आश्वस्त केले.
नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्प लवकरच हाती घेणार आहोत. त्यातून कृषी क्षेत्राला मोठी मदत होईल. नाशिकच्या कामांना गती देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. जिथं गरज आहे तिथं आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. झोपडपट्टी मुक्त नाशिक शहर साकारण्यासाठी आमचा प्रयत्न आहे.असं देखील ते म्हणाले.
गोदावरीला प्रदूषण मुक्त करायचं आहे. नाशिकचे द्राक्ष आणि वाईन जगात प्रसिद्ध आहे. कांदा, टोमॅटो, डाळिंब इतर पिकं सुद्धा इथला शेतकरी घेतो, त्याच्या पाठीशी आमचं सरकार ठामपणे उभं आहे, असं देखील ते म्हणाले.